नागपूर: ‘जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका धाडसी आहे. मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती भूमिका आहे. त्याचा वैयक्तिक राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाचे संपूर्ण कॅडर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे’, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
आमचे लक्ष्य ५१ टक्के जागा
शिंदे गटाने ठाण्यात एका जागेवर दावा ठोकला आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले,‘जो पक्ष यापूर्वी ज्या जागेवरून जिंकला आहे ती जागा त्यांचीच आहे. पण, त्याशिवाय कोण कुठून लढणार याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. भाजप आणि इतर सर्व सहकारी पक्ष मिळून तयार झालेल्या महायुतीचे लक्ष्य ५१ टक्के जागा जिंकण्याचे आहे. त्यामध्ये आमची गरज पडल्यास आम्ही सहयोगी पक्षांना मदत करू. जिथे आम्हाला सहयोगी पक्षांची मदत लागेल तिथे ते करतील. अद्याप कुठल्याही स्वरूपाचे जागावाटप झालेले नाही.’
कांदा निर्यातबंदीवर लवकरच निर्णय
कांदा निर्यातबंदी संदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवार आणि पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सकारात्मक आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा निघेल, असे सुतोवाचही बावनकुळे यांनी केले.
Users Today : 29