सांगली | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नसल्याचा ठाम दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी विरोधकांना थेट सल्ला देत, “वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, अर्ज मागे घ्या” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे नेतेही जोरदार तयारीत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी हा दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
सांगली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात सभेला संबोधित करताना पाटील यांनी नगरपालिका, नगरपरिषद तसेच महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाचा उल्लेख केला. “नगरपालिका निवडणुकांचे निकाल पाहता विरोधकांना जमिनीवरील वास्तव कळले असेलच,” असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या निवडणुकांच्या निमित्ताने विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
“उद्या अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. परिस्थिती लक्षात घेता विरोधकांनी शहाणपण दाखवावे आणि अर्ज मागे घ्यावेत,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा वेळ आणि पैसा वाया घालवू नये, असा टोला लगावला.
दरम्यान, ग्रामीण भागातील राजकारणावर भाष्य करताना पाटील म्हणाले की, गट, यंत्रणा, आर्थिक ताकद या सगळ्या संज्ञा त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. विरोधक कितीही यंत्रणा आणि पैसा लावला तरी जनतेचा कौल बदलू शकत नाही. शेवटी विकासाचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या असून, लाडकी बहीण योजना तसेच शेतकरी सन्मान योजना यामुळे सर्वसामान्य जनता समाधानी आहे. हाच जनतेचा पाठिंबा आगामी निवडणुकांच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येईल, असा दावाही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Users Today : 10