अतुल कुलकर्णी, सावरगाव (जि. बीड): ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही दिवस शोधत आहे,’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना मंगळवारी गर्भित इशारा दिला. ‘बीड लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही,’ असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
देशात सारे आलबेल आहे म्हणून तुम्ही मेळाव्याला आला आहात का? शेतकरी सुखी आहेत का? शेतकऱ्यांना विमा मिळाला का? अनुदान मिळाले का? शेतमजुराच्या हाताला काम आहे का? महाराष्ट्रात खूप सारे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना, सरकारकडून खूप अपेक्षा आहेत, आता अपेक्षाभंग सहन करू शकत नाही.
आपल्याच सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून दहा वर्षे झाली, तरी स्मारक पूर्ण झाले नाही. आता स्मारक उभारू नकाच. स्मारक उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांना ऊसतोडणीतून मुक्त करून शिक्षण आणि पोषण द्या. धर्माच्या वाढलेल्या भिंती पाडा, तेच गोपीनाथ मुंडेंचे खरे स्मारक ठरेल.
मी २०२४मध्ये मैदानात आहे आणि मला कोणीही रोखू शकणार नाही. आगामी काळात मी सिंदखेड राजा येथे जाऊन राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, बुलढाणा येथे जाणार आहे.
बीडमधून लढा वगैरे चालणार नाही’
‘अनेक जण मला माझ्या मतदारसंघातून लढा असे सांगत असतात. प्रीतमताईंच्या बीड लोकसभा मतदारसंघातून लढा असेही काही जण म्हणत आहेत; पण तसले काही चालणार नाही. एखाद्याच्या कष्टाचे मी खाणार नाही,’ असे सांगून त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे स्पष्ट केले.
Users Today : 28