सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे? डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपींचा खळबळजनक दावा

Khozmaster
2 Min Read

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यातील आरोपींनी ‘सीबीआय’ने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला आहे. खटल्याच्या सुनावणीत बुधवारी न्यायालयाने आरोपींना त्यांचे अखेरचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. या वेळी न्यायालयाने आरोपींना तिनशेहून अधिक प्रश्न विचारले असता आरोपींनी ‘सीबीआय’चे आरोप फेटाळून लावले.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ या दिवशी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आले आहेत. यातील अॅड. पुनाळेकर आणि भावे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

आतापर्यंत या प्रकरणात ‘सीबीआय’च्या वतीने २० साक्षीदार सादर करण्यात आले. त्यांची उलट तपासणीही घेण्यात आली. दरम्यान, गुरुवारी पुन्हा विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात दाभोलकर खून खटल्याची सुनावणी झाली. यामध्ये आरोपींना त्यांचे अखेरचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायालयाने आरोपींना जवळपास ३००पेक्षा अधिक प्रश्न विचारले. बहुतांश प्रश्नांची उत्तरे आरोपींनी ‘नाही’, ‘माहिती नाही’ अशी दिली; तसेच ‘सीबीआय’ने जे पुरावे सादर केले आहेत ते खोटे असल्याचे आरोपींनी न्यायालयात सांगितले.शरद कळसकर, अॅड. संजीव पुनोळकर आणि वीरेंद्र तावडे यांनी त्यांचे लेखी म्हणणेही न्यायालयाला सादर केले; तसेच वीरेंद्र तावडे याने न्यायालयात अर्जाद्वारे ‘सीबीआय’च्या तत्कालीन विभागीय पोलिस अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्याची मागणी केली. या खटल्याची पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार असून, बचाव पक्षाला साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *