पुण्यात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचं प्रकाशन ;अभिनेते किरण माने यांचा ‘शब्दयोद्धा’ पुरस्काराने गौरव

Khozmaster
3 Min Read

पुणे(प्रतिनिधी) : विषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकातून मांडले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाने वाचले पाहिजेत आणि आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे केले. तर, यावेळी अभिनेते किरण माने यांचा ‘शब्दयोद्धा’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे संपादक अभिजीत कांबळे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, लेखक जगदीश ओहोळ, परिवर्तनचे अध्यक्ष महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत. ते ग्लोबल बाबासाहेब आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत. ते ग्लोबल बाबासाहेब सांगण्याचे काम लेखक जगदीश ओहोळ यांनी या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकातून केले आहे, असे प्रतिपादन अभिजीत कांबळे यांनी केले.यावेळी बोलताना समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे म्हणाले की, ‘माझ्यासारखा एक मिल कामगाराचा नातू व कष्टकऱ्याचा मुलगा आज समाज कल्याण सहाय्यक आयुक्त झाला आहे, हे केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच! अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यावधी लोकांचे जग बदललेले आहे व आज ते लोक एका नव्या आधुनिक जगामध्ये जगत आहेत. हे कोट्यावधी लोकांचे जग बदलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगदीश ओहोळ यांनी या पुस्तकातून मांडले आहेत, ते आजच्या पिढीतील प्रत्येक तरुणाने वाचले पाहिजेत.या पुस्तकात मांडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र हे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही तर सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हे सांगण्यात हे पुस्तक यशस्वी झाले आहे, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर राऊत गंगासेन वाघमारे यांनी केले, तर आभार परिवर्तन चे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मानले.

अभिनेते किरण माने यांचा ‘शब्दयोद्धा’ पुरस्काराने गौरव

शिव, फुले, शाहू , आंबेडकर विचारांची भूमिका घेऊन सर्व माध्यमांमध्ये खंबीरपणे मत मांडणारे सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचा या कार्यक्रमांमध्ये जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने ‘शब्दयोद्धा’ पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. संत तुकारामांचा अभंग ते बाबासाहेबांचा संविधान ही मांडणी करणारे किरण माने यापुढेही असेच खंबीरपणे लिहीत राहतील व भूमिका घेतील, असे मत यावेळी संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

0 9 3 8 3 7
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *