राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या

Khozmaster
3 Min Read

पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात १०४ कोटी रुपयांच्या स्मारक; तसेच परिसराच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाल्याने स्मारकाच्या उभारणीला आता गती मिळणार आहे. मात्र, स्मारकाचा आराखडा मंजूर करण्यास राज्य सरकारला आठ वर्षांचा कालावधी लागल्याचेही समोर आले आहे.                                                          स्मारक तीन टप्प्यांत

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला. जिल्हास्तरीय समितीने २५४ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो मुख्य सचिवांच्या समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता. आराखड्यांतंर्गत प्रस्तावित कामे तीन टप्प्यांत ३१ मार्च २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत १०४ कोटी १२ लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर करावा, अशी सूचना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचा १३६ कोटी ४४ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.स्मारक उभारणीत काय होणार?

– स्मारकाचा जीर्णोद्धार, जन्मखोली, थोरला वाडा तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर व इतर

– स्मारकातील सुविधा व विकास, सुविधागृह, वाचनालय, उपहारगृह

– नदी परिसर सुधारणा, राम घाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा

– संरक्षित भिंत व वाहनतळ

– पदपथ, अंतर्गत रस्ते, लँडस्केप क्षेत्र

– खुले सभागृह, पुतळे, म्युरल्स

– संपूर्ण स्मारकाची प्रकाश व्यवस्थास्मारकाच्या आराखड्याबाबत समितीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र, त्याला निधी मिळत नसल्याने विधिमंडळात गेल्या वर्षी तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. आता राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिल्याने १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत निविदा करून काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे.– दिलीप मोहिते पाटील, आमदार ,खेड

आठ वर्षांनंतर आराखड्याला मान्यता

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा २००७मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरुनगर येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती; तसेच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात वेळोवेळी आर्थिक तरतूद केली जाईल, असेही आश्वासन बापट यांनी दिले होते. त्यानंतर आराखडा तयार करून २०१६ साली जिल्हा प्रशासनाकडून सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र, त्याकडे नगरविकास विभागाने पाहिलेच नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मान्यता मिळण्यास आठ वर्षांचा कालावधी लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विकास आराखड्यासह निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती उच्चाधिकारी समितीला सादर करते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेण्यासाठी ही समिती शिफारस करते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या समितीने मान्यता दिली.

0 9 3 8 4 0
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *