हत्तींकडून होणाऱ्या नुकसान भरपाईबाबत संभ्रम

Khozmaster
3 Min Read

Kolhapur News : गडचिरोली जिल्‍ह्यात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी नुकतेच दिले. असे असले तरी कोल्हापुरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीच्या घटनांत दुपटीने वाढ झाली आहे, मात्र कोल्हापूरला मिळणाऱ्या भरपाईत कोणतीही वाढ जाहीर केलेली नाही.

त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, नाराजीचा सूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत हत्तींकडून नुकसान होण्याच्या घटना दीडशेहून अधिक घडल्या, मात्र भरपाई जेमतेम पाच हजार ते मृत्यू झाल्यास दहा लाख एवढी जै से थे आहे.

गडचिरोली परिसरात घनदाट जंगल आहे. तेथील जंगली भागात असलेल्या आदिवासींची गावे आहेत. हत्तींचा कळप आला की, शेतीचे नुकसान करतो. तसेच नागरीवस्तीत नुकसान करतो. त्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी नुकतीच बैठक घेऊन तेथील भरपाईत वाढ करण्याचे आदेश दिले.

थोड्याफार फरकाने अशीच स्थिती कोल्हापुरात आहे. जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीपर्यंत हत्ती येतात. मात्र जास्त काळ वास्तव्य आजरा, चंदगड, भुदरगड याच भागात असतो.

येथेही शेती आहे. जंगला शेजारीही वाड्या-वस्त्या आहेत. हत्ती रात्री-अपरात्री किंवा कधी दिवसाही शेतात फिरतो. नारळी, काजूच्या बागा उद्‌ध्वस्त करतो. भात पीक, उसाचे नुकसान करतो; तर काही वेळा नागरीवस्तीत येऊन पाण्याच्या टाक्यापासून ते घराच्या भिंतीपर्यंतचे नुकसान करतो.

हत्तीने केलेल्या हल्ल्यात आजवर २२ जण जखमी झाले. तिघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दोन वर्षांत नुकसानीच्या घटना दीडशेवर झाल्या. यावर वनविभागाकडून हत्तीकडून नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात. थोड्याफार पाठपुराव्यानंतर भरपाई जरूर मिळते; मात्र ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.

वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड भागात डोंगरीभागात शेती करणे खर्चिक बाब आहे. वर्षानुवर्षे बागांची काळजी घ्यावी लागते. अशात हातातोंडाला आलेल्या पिकांचे हत्तींकडून नुकसान होते. पन्नास हजारांचे नुकसान झाले, तरी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात कमी पडलेल्यांना कमी भरपाई मिळते. याची शासनाने फारशी गांभीर्याने नोंद घेतलेली नाही, असेच दिसते.

उपाययोजनांवर केवळ चर्चाच

चंदगडमध्ये चार हत्ती, आजऱ्यात चाळोबा जंगलात एक हत्ती, भुदरगडात एक हत्तीचे बारमाही वास्तव्य आहे. याशिवाय दोडामार्गाकडून तीन ते चार हत्तींची ये-जा याच भागात असते. यात पाच हत्तींचा एक कळप फिरत होता.

यातील दोन हत्ती फिरत शाहूवाडी हद्दीपर्यंत आले होते. यात येण्या-जाण्याच्या मार्गावर असलेल्या जंगलानजीकच्या शेती त्यांच्याकडून नुकसान झाले होते. हत्तीकडून बारमाही होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी हत्ती ग्राम तयार करणे भरपाई वाढ करणे तसेच हत्तींना पकडणे,

जंगलात सोडणे, रेस्क्यू पथक तयार करणे आदी उपाययोजनांवर चर्चा झाल्या; मात्र प्रत्यक्षात फारसे काही घडलेले नाही. त्यामुळे गडचिरोलीतील भरपाई वाढ केली, तशीच भरपाई वाढ कोल्हापुरात होणे आवश्यक आहे.

0 9 3 8 5 7
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *