जळगाव प्रतिनिधी :
राज्यातील अवैध वाळू उपसा आणि वाढत्या वाळू माफियांच्या कारवायांवरून विधिमंडळात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. Eknath Khadse यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधानपरिषदेत बोलताना खडसे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत त्यांनी गेल्या दीड वर्षांत तब्बल २६ वेळा लेखी पत्रे दिली आहेत. महसूल मंत्री, महसूल आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
वाळू माफियांच्या दहशतीमुळे तहसीलदार आणि प्रांताधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. अधिकाऱ्यांच्या वाहनांवर व घरांवर हल्ले होण्याच्या घटना घडत असून, त्यांना पुरेसे पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. माजी आयएएस अधिकारी Tukaram Mundhe यांच्यासारख्या कडक आणि निडर अधिकाऱ्यांची गरज असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय, वाळू माफियांविरोधात कारवाई का होत नाही, यामागे ‘हप्तेखोरी’चे जाळे असल्याचा गंभीर आरोपही खडसे यांनी केला. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना माफियांकडून आर्थिक लाभ मिळत असल्यानेच कारवाई थंडावते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. “सरकारमध्ये ताकद असेल तर राज्यातील वाळू आणि मुरूम माफियांना बंद करून दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. या गंभीर आरोपांनंतर सरकार काय भूमिका घेते आणि संबंधित प्रशासनावर कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Users Today : 18