महाराष्ट्र :
राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राज्यभरात 2 लाख 50 हजार 832 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 5 जणांना उष्माघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरोग्य तपासणीचा वेग वाढवला
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर विशेष पथके तैनात केली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 45,299 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तर मुंबई येथे 51,826 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे.
याशिवाय पालघर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतही उष्णतेचा मोठा परिणाम दिसून येत असल्याने प्रशासनाकडून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.
पाच जिल्ह्यांत उष्माघाताचे रुग्ण
राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 5 रुग्ण आढळले आहेत. यात पालघर (2), रायगड (1), नाशिक (1) आणि जळगाव (1) या जिल्ह्यांचा समावेश आहे. सुदैवाने सर्व रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत राज्य सरकारने विशेष कृती आराखडा राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत सर्व जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ORS आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उन्हापासून बचावासाठी उपाय
☀️ तहान नसली तरी नियमित पाणी प्या.
🥛 लिंबूपाणी, ताक आणि नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.
🕒 दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा.
🧢 बाहेर पडताना डोके टोपी किंवा रुमालाने झाका.
👕 हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा.
चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा ताप जाणवत असल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ⚠️
Users Today : 34