चिखली –
चिखली तालुक्यासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत.
मेरा बुद्रुकसह परिसरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्ण वारे वाहत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी, दुपारच्या वेळेत गावातील बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
शेतकरी व शेतमजूर सकाळच्या थंड वातावरणात कामे आटोपून दुपारच्या वेळेत विश्रांती घेत आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेये, ऊसाचा रस, ताक आणि लिंबू सरबत यांचा आधार घेत आहेत. तसेच माठ व रांजण विक्रीच्या दुकानांवरही गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
*आरोग्य विभागाचा सल्ला*
उष्णतेमुळे डिहायड्रेशन (पाणी कमी होणे) आणि उष्माघात (Heat Stroke) यांचा धोका वाढला असून आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
* जास्तीत जास्त पाणी प्यावे
* बाहेर पडताना डोक्यावर रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा
* सुती व हलके कपडे परिधान करावेत
* तब्येतीत त्रास जाणवल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा
नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Users Today : 21