छत्रपती संभाजीनगर:नोकरी टिकवायची असेल तर शिक्षकांनो मुख्याध्यापकांना घेऊन बसा. दहा-दहा रुपयांची वर्गणी गोळा करा, टमटम लावा अन् पोरं शाळेत आणा, असा सल्ला शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना दिला. शाळेचा पट टिकवण्यासाठी पोरांना सोन्यासारखा भाव आला आहे. कारण पोरच मिळेनात. टमटम लावू, पोरांना शाळेत आणू व संख्या टिकवू असे ते म्हणाले.
शिक्षण विभागातर्फे आयोजित शिक्षक पुरस्कार समारंभ आमदार काळे यांच्या उपस्थितीत झाला. संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, जयश्री चव्हाण, अरुणा भुमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना काळे पुढे म्हणाले, अतिरिक्त शिक्षक व्हायचं नसेल, आहे त्याच शाळेत रहायचे असेल तर पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांनाच काम करावे लागेल. आज पोरांना सोन्यासारखा भाव आला. शाळाच एवढ्या झाल्या आहेत की, पोरं कुठून येणार? पुन्हा म्हणतात, ‘हम दो हमारा एक’. एका एका गावात चार-चार शाळा झाल्या. सीबीएसई, आयसीएसई सगळ्या गावांमध्ये इथून तिथपर्यंत पिवळ्या रंगाच्या गाड्या. आता नवीन फॅड आहे. मुलाचा दाखला पाहिजे असेल तर पालकच दोन हजार रुपये द्या, अशी मागणी करू लागल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
आपली शाळा, नोकरी टिकायची असेल तर मुख्याध्यापकांना घेऊन बसा. वर्गणी गोळा करा अन् टमटम लावा. पोरांना शाळेत आणू, संख्या टिकवू, गुणाने तिथेच नोकरी करू. आपली नोकरी कायमस्वरुपी आहे. अतिरिक्त होवू इतर काय, असा तुमचा समज आहे. परंतु अतिरिक्त शिक्षकांचे तीन तीन वर्ष झाले समायोजन होत नाही. कशाला गाव सोडून, बायको-लेकर सोडून जाता. त्यापेक्षा पोरं गोळा करून शाळेत आणा अन् पद टिकवा. शिक्षक आमदारांचा सल्ला समारंभात आश्चर्याचा, चर्चेचा विषय ठरला आहे.
Users Today : 54