संभाजीनगरकांनो लक्ष द्या! मालमत्ता कराबाबत महापालिकेचा मोठा निर्णय, या आता सवलती बंद

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याच बरोबर मालमत्ता करावर ज्या विविध सवलती दिल्या जातात त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही थकित मालमत्ता कर न भरणाऱ्या २१९ मालमत्ता महापालिका जप्त करणार आहे. यात क्षेत्र क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रातील १२३ तर, क्षेत्र क्रमांक आठच्या कार्यक्षेत्रातील ९६ मालमत्तांचा समावेश आहे.

पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. बड्या मालमत्ताधारकांकडे थकीत मालमत्ता कर वसुल करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यासाठी पालिकेतर्फे संबंधित मालमत्ताधारकांवर कारवाई होणार आहे. क्षेत्र एकच्या सहाय्यक आयुक्तांनी १२३, तर क्षेत्र आठच्या सहाय्यक आयुक्तांनी ९६ प्रकरणे सादर केली.

मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव केला जाणार आहे. महापालिका अधिनियमानुसार ही कारवाई केली जाणार आहे. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका अभय योजना जाहीर करते. आता ही योजना जाहीर न करण्याचा निर्णय पालिका प्रशासकांनी घेतला. एखाद्या मालमत्ताधारकाने आपल्या मालमत्तेवर सौरउर्जा पॅनेल बसविले असेल किंवा पावसाचे पाणी साठविण्याची यंत्रणा उभारली असेल तर त्या मालमत्तेच्या करात पालिकेकडून सवलत दिली जात होती, तीही बंद करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. बैठकीमध्ये तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बहुतांश मालमत्ताधारक सकाळी आणि सायंकाळी घरी असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कर वसुलीसाठी सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळात कर वसुलीचे काम करावे असे निर्देश देण्यात आले. शनिवार व रविवारी जे कर्मचारी काम करतात त्यांना सोमवारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देशदेखील प्रशासकांनी दिल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी कळवले आहे.
८३ कोटी रुपयांची कर वसुली

महापालिकेने यंदा मालमत्ता करवसुलीचे ३५० कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात चालू वर्षाची २५० कोटी रुपये आणि मागील थकबाकी १०० कोटी रुपयांचा समावेश आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून १३० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. एक मे २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मालमत्ता कराच्या माध्यमातून ७१.०७ कोटी रुपये तर पाणीपट्टीच्या माध्यमातून १२.३९ कोटी असा एकूण ८३.४६ कोटींचा कर वसूल करण्यात आला अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *