पुणे ते लोणावळा रेल्वेचा वेग वाढणार; स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम पूर्ण, ‘असा’ होणार फायदा

Khozmaster
2 Min Read

पुणे: पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा दरम्यानचे स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम रविवारी अखेर पूर्ण झाले. त्यामुळे आता पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वे गाड्यांचा वेग वाढून त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा दरम्यान ६०.५९ किलोमीटरचे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम सुरू होते.लोणावळ्यापासून चिंचवडपर्यंत ४८ किलोमीटरच्या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम २०२०मध्ये पूर्ण झाले होते. पण नंतर चिंचवड ते शिवाजीनगर मार्गाचे सन २०२० पासून काम प्रलंबित होते. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वेळेला चिंचवड ते शिवाजीनगर मार्गाचे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये चिंचवड ते खडकी दरम्यान १०.१८ किलोमीटरमधील स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. शेवटी फक्त खडकी ते शिवाजीनगर दरम्यानचे ६.१६ किलोमीटरचे काम शिल्लक राहिले होते.

या कामासाठी रेल्वे प्रशासनाने शनिवारी रात्रीपासून ते रविवारी रात्री सातपर्यंत ब्लॉक घेतला होता. या काळात खडकी ते शिवाजीनगर दरम्यान राहिलेले स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. आता पुणे ते लोणावळा दरम्यानच्या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यामुळे रेल्वेचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमध्ये प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे विभागाची क्षमता सुधारेल आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.खडकी ते शिवाजीनगर दरम्यानचे इंटर लॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पाच दिवसांपासून सुरू होते. त्यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत होते. गेल्या चोवीस तासांत कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम पूर्ण करण्यासाठी रविवारी ३७० कर्मचारी आणि अधिकारी काम करीत होते. सायंकाळी साडेसहा वाजता हे काम पूर्ण झाले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा फायदा

– स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमध्ये प्रत्येक एक किलोमीटरवर सिग्नल असल्यामुळे रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार.

– रेल्वे गाड्या अचूक वेळेत धावून प्रवासाच्या वेळेत बचत होते.
– स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये सुलभता येते.
– रेल्वे प्रशासनाला जास्त गाड्या चालविणे शक्य होणार.

0 9 4 1 7 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *