महाराष्ट्र : २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मैटराइज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे? महायुती की महाविकास आघाडी? मैटराइजच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. मैटराइजच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) यांना धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मविआला किती जागा मिळणार?
मैटराइजच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी महायुती आघाडीला १४५-१६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १०६-१२६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणात महायुतीला किती मताधिक्य?
मतांच्या संख्येत सत्ताधारी महायुती आपल्या विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला मागे टाकण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला ४७ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीला ४१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतर मित्रपक्ष किंवा अपक्षांना १२ टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे.
ठाणे-कोकणात मोडणार विक्रम?
मैटराइजच्या सर्वेक्षणात भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि ठाणे-कोकण भागात प्रचंड जनसमर्थन मिळणार असल्याचं समोर आलं आहे. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात ४८ टक्के, विदर्भात ४८ टक्के आणि ठाणे-कोकणात ५२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारख्या भागात ४७ टक्के आणि ४४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
मैटराइजच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वाधिक पसंतीचे CM राहिले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना जेव्हा विचारण्यात आले की, मुख्यमंत्रीपदासाठी तुमची निवड कोणाला आहे? तेव्हा ४० टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सहमती दर्शवली. तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना २१ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. ६५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी शिंदे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे, त्यापैकी ४२ टक्के लोकांनी ते खूप चांगले आहे आणि २७ टक्के लोकांनी काम सरासरी चांगलं असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे सर्वेक्षण कसे केले?
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या खराब कामगिरीच्या संभाव्य कारणांबद्दल विचारले असता, सुमारे ४८ टक्के लोकांनी त्याचं कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात झालेल्या पक्षफुटीमुळे असल्याचं सांगितलं आहे. मैटराइजचं हे सर्वेक्षण १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले. सर्वेक्षणात राज्यातील १,०९,६२८ लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये ५७ हजारांहून अधिक पुरुष, २८ हजार महिला आणि २४ हजार तरुणांच्या मतांचा समावेश आहे.
Users Today : 47