राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विक्रमी मतदान झाले. आता निकालाचे वेध लागले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात कोणाचे सरकार येणार आणि काय समीकरण असणार याच्या चर्चा सुरू असतानाच सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार असल्याचे चित्र दिसून आले. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही सत्ता निवडू! आम्ही सत्तेत राहायला निवडू!, असेही ते म्हणाले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा कल हा सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत असणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडी की तिसरी आघाडी बाजी मारणार याचे चित्र शनिवारी स्पष्ट होणार आहे. पण, निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीसोबत जाऊ पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे सूत जुळून आले नव्हते. राज्यात १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांचा निकाल शनिवार, २३ नोव्हेंबर पासून सकाळी जाहीर होतील.
Users Today : 4