बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
जल जीवन मिशन अंतर्गत वरवंड-पिपंरखेड पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी वरवंड (ता.जि. बुलढाणा) येथे ६ मार्च पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यांच्या आंदोलनाला गावकऱ्यांचाही मोठा पाठींबा मिळाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी त्यांच्या मागण्यासंदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १६ मार्च पासून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करून युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. दिलेले लेखी आश्वासन व गावकऱ्यांच्या आग्रहास्तव दत्तात्रय जेऊघाले यांनी अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. वरवंड (ता.जि.बुलढाणा) येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कामासाठी शासनाच्या वतीने ४ कोटी ९९ लक्ष ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर कारण्यात आला आहे. या संदर्भात ई-निवेदा झाल्यानंतर सदर योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश लक्ष्मण देशमूख शासकीय कंत्राटदार (रा. खामगाव) यांना ३१-०१-२०२३ रोजी देण्यात आला आहे. सदर कार्यारंभ आदेशानुसार सदर योजनेचे १ वर्षाच्या आत म्हणजेच ३१-०१-२०२४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते परंतु आज मार्च २०२५ उजाडले तरी योजने काम ५०% ही पूर्ण झालेले नाही. सदर योजनेच्या अंदाज पत्रकानुसार कोणतेही काम अस्तित्वात नाही. सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन न करता जुन्याच पाईपलाईनचा वापर करण्यात आला आहे. तसेच पाण्याच्या टाकीचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. कोणत्याही प्रकारची वितरण व्यवस्थेचे काम अद्याप करण्यात आलेले नाही, असे असतांना कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून योजनेचे काम अपूर्ण असतांनाही संपूर्ण देयके काढण्याचा घाट घातला होता व वरवंड गावकऱ्यांना हक्काच्या पाणी पुरवठा योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम या निमित्त होत होते, त्यामुळे सदर योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे व योजनेच्या कमाला विलंब करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व सदर कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी ६ मार्च पासून वरवंड येथील हनुमान मंदिरासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यांच्या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठींबा मिळाला.
आंदोलनासंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकारी यांची भेट घेवून या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाचे डोके ठिकाणावर आले व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला झुकावे लागले. 12 मार्च च्या सायंकाळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १६ मार्च पासून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करून युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. दिलेले लेखी आश्वासन व गावकऱ्यांच्या आग्रहास्तव साहाव्या दिवशी दत्तात्रय जेऊघाले यांनी अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले.या आंदोलनामुळे बंद पडलेले पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू होणार आहे व योजनेच्या कामात ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण होणार आहे, हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. जर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिलेला शब्द फिरवला तर मुख्य अभियंता यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशारा दत्तात्रय जेऊघाले यांनी यावेळी दिला आहे.
Users Today : 91