चिखली:-( तालुका प्रतिनिधी )
शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण गंभीर समस्या बनले असून, शासनाने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी १९ मार्च रोजी चिखली येथे अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.
१९ मार्च रोजी राज्यभर असे आंदोलन केले जाते. चिखलीतही शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यावर्षीही आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर होणार असून, पूर्णतः सामाजिक हेतूने आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन देविदास कणखर, डॉ. सत्येंद्र भुसारी, कैलास गाडेकर, उद्धव थुट्टे, संतोष काळे, शंतनू पाटील, सुभाष देव्हडे, विनायक सरनाईक आणि डॉ. शिवशंकर खेडेकर यांनी केले आहे.
Users Today : 120