बुलढाणा:-(जिल्हा प्रतिनिधी)
शालेय जीवनात मिळणाऱ्या बक्षिसांचे प्रत्येकांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व असते. आपल्याला छंदामधून आनंदी राहता येते. छंदाची सवय लहानपणापासूनच लागू शकते. छंद असे असतात की त्यातून आनंद तर मिळतोच आणि त्यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास देखील होतो, असे प्रतिपादन डॉ. वैशाली निकम यांनी केले.
विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेचा वार्षिक बक्षीस समारंभ १८ मार्च रोजी पार पडला. या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुनिता इंगळे यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी शालेय सांस्कृतीक मंत्री खुशी बिडवे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ज्या गोष्टीत आपल्याला क्रमांक मिळाला पाहिजे, असे वाटते त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. लहान गोष्टीचा दररोज सराव केला तर आपण त्यात निश्चितच यश मिळवू शकतो. ज्यांना बक्षीस मिळाले नाही, त्यांनी पण प्रयत्न केले पण ते कदाचित थोडे कमी पडले असतील. आपण छोटे असलो आणि मोठे असलो तरी आपल्याला जीवनात दोन गोष्टी आल्याच पाहिजे. आपल्याला कुठलातरी एक खेळ खेळता आला पाहिजे आणि आपल्याजवळ कुठली तरी एक कला असलीच पाहिजे. मोरामध्ये जसे विविध रंग असतात तसेच प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कला खेळ आणि छंद असले तर आपले व्यक्तिमत्व विविध अंगी घडू शकते, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतातून गजानन इंगळे यांनी वर्षभर शाळेत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेत वर्षभर राबवण्यात आलेल्या मातीचा बैल बनवा, फुलांचा हार तयार करा, नैसर्गिक साधनांपासून व कृत्रिम साधनांपासून राखी तयार करा यासारख्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक दादाराव जाधव तर आभार सोनल इंगोले यांनी मानले.
Users Today : 181