चिखली:-तालुका प्रतिनिधी
शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी चिखलीत एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली. तरीही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर शेती समस्यांची जाणीव असलेले अनेक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करतात. यंदाही शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ १९ मार्चला दुपारी १२ वाजता आंदोलन सुरू केले. आंदोलन सामाजिक स्वरूपाचे होते. जवळपास सर्वच पक्षातील शेतकरीपुत्र या आंदोलनस्थळी उपस्थित होते. पक्ष व राजकारणविरहीत आंदोलन असल्याने शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकरीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी आपले मांडले. शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करण्याची दिशा ठरविण्यात येणार असून लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना संतप्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. नुकतेच राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केलीत्यामुळे, शेतकऱ्यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
Users Today : 211