सिंदखेड राजा:- तालुका प्रतिनिधी
प्रशासनातील अधिकारीच ग्रामस्थांना ठराविक दिवशी खात्रीने भेटणार असल्याने ग्रामस्थांची कामे अडून राहणार नाही. आपले प्रश्न समोरासमोर मांडायला त्यांना पुरेसा वेळ मिळेल. तसेच स्थानिक पातळीवर एखादे काम होणार नसेल तर ते अधिकारीच लोकांना पुढील कारवाईसाठी योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. पण त्यांचे बहुसंख्य प्रश्न हे त्या ग्रामस्थ दिनीच नक्कीच सोडवले जातील, असा विश्वास सिंदखेडराजाचे नायब तहसीलदार डॉ. प्रविणकुमार वराडे यांनी व्यक्त केला.ग्रामपंचायत कार्यालय रूम्हना येथे ग्रामस्थ दिनाच्या आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंडळ अधिकारी जाधव, माजी सरपंच तथा ग्रा.पं. सदस्य शिवराज कायंदे हे होते. स्थानिक पातळीवरचे प्रश्न घेऊन नागरिक तालुका व उपविभागीय कार्यालयात चकरा मारतात. तासन्तास ताटकळत उभे राहून तहसील कार्यालयात बाहेर दिवस खर्च करणाऱ्या ग्रामीण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आता अधिकारीच त्यांच्या गावात आले आहेत. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायत सुरू करण्यात आले आहे, असे डॉ. वराडे यांनी सांगितले. तर शिवराज कायंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये व गावावांत ग्राहक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सातबारा उतारा हा ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतो, परंतु, ही यंत्रणा हाताळण्याएवढी लोकांची मानसिकता बनलेली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता आणण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25