चिखली:-तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार चिखली तालुक्यातील गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.एमआयडीसीतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ५० एचपीचे पंप बदलून ७५ एचपीचे नवे पंप बसवणे आणि पाण्याची गळती थांबवणे. तसेच अंतर्गत नाल्यांचे बांधकाम करणे. उद्योजकांना कर्जपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एमआयडीसीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेची स्वतंत्र शाखा स्थापन करणे. प्रस्तावित पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून गुन्हेगारीला आळा घालणे. अशा प्रकारच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतरची बैठक आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली घेतल्या जाणार असल्याचे तहसीलदार संतोष काकाडे यांनी सांगितले. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर महिन्याला बैठका आयोजित केल्या जातील. या बैठकीत चिखली एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रमेश खेडेकर, सचिव अमित जैन, सुनील मोडेकर, सिद्धेश्वर ठेंग, पंकज कोठारी, सूर्यकांत मेहत्रे, अशोक वडणकर, ज्ञानेश्वर जाधव आणि एमआयडीसी उपविभाग खामगावचे युनिट धुर्वे यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते. या बैठकीच्या आयोजनामुळे चिखली एमआयडीसीतील उद्योजकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Users Today : 65