लिहा बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी
फार्मर कप स्पर्धेत तालुक्याने पुन्हा मुसंडी मारत तब्बल सहा लाखांची बक्षिसे पटकावली आहेत. लिहा येथील महात्मा फुले शेतकरी गट राज्यस्तरावर तर लिहा बुद्रूक, खडबडी व कोथळी येथील शेतकरी गट तालुकास्तरावर सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. ज्ञान आणि विज्ञानावर आधारित गट शेतीच्या लोक चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या शेतकरी गटांचा सन्मान व पुरस्कार वितरण २३ मार्च रोजी बालेवाडी (जि. पुणे) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावर्षी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ४६ तालुक्यांमधून ४ हजार ५०० शेतकरी गट सहभागी झाले होते. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२४ मधील ५ लक्ष रुपयांचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ कामगिरी पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गट (लिहा बुद्रुक) ने पटकाविला. तालुकास्तरीय स्पर्धेत भूमिपुत्र शेतकरी गट (लिहा बुद्रुक) ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या गटाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. परिवर्तन शेतकरी गट (खरबडी) व निसर्ग राजा महिला शेतकरी गट (कोथळी) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विजेत्या गटांना मोफत फवारणी ड्रोन देण्याची घोषणा केली. मात्र, यासाठी रासायनिक फवारणी कमी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गटशेतीची चळवळ अधीक वापक करणार फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत, श्रमाची जोड देत एकत्र येत आपली शेती अधिक नफ्याची करून दाखवली. शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमाचा सन्मान पुणे येथे मुख्यमंत्री यांचे हस्ते झाला ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करणारी गटशेतीची चळवळ वाढवण्यासाठी पुढील काळात आणखी मोठे काम करण्याची तयारी पानी फाऊंडेशन करत असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे समन्व्यक निलेश बढे, ब्रह्मदेव गिहे यांनी दिली.
Users Today : 96