चिखली:-तालुका प्रतिनिधी
जिवंत सातबार हा पथदर्शी प्रकल्प अतिशय नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा प्रकल्प आहे. राज्यभरातील सर्व आमदारांनी आपापल्या भागामध्ये तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी बैठकी घेऊन या योजनेला प्रसिद्धी द्यावी व ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना तलाठी, तहसील ऑफिस येथे वारसनोंदी करण्याकरिता माराव्या लागणाऱ्या चकरा, त्यामध्ये त्याची आर्थिक व मानसिक होणारी कुचंबना, हा त्रास टाळण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेताताई महाले यांनी चिखली तहसीलदार यांना सोबत घेऊन संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरु केली. अवघ्या दीड महिन्यांत संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील मयत वारसांच्या सातबारावर त्यांच्या वारसांच्या नोंदी झाल्या. आ. श्वेताताई महाले यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. या संपूर्ण योजनेचा अभ्यास केल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही योजना अतिशय नाविन्यपूर्ण व पथदर्शी असल्याने संपूर्ण राज्यभरात लागू करण्याच्या दृष्टीने आज सभागृहात शासननिर्णय प्रसिद्ध केला. या योजनेला राज्यभरात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने याचा योग्य आराखडा व त्यामध्ये काही आणखी सुधारणा करता येतील का? या दृष्टीने सभागृहात चर्चेसाठी हा विषय घेण्यात आला होता. अगदी विरोधी पक्षातील सदस्यांनी सुद्धा या योजनेचे तोंडभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे त्यांना घरपोच वारसा नोंद होण्यासारखे असून, शहरी भागातील मयत व्यक्तींच्या वारसांना सुद्धा अशा प्रकारे सुटसुटीत व लवकर वारसा नोंद प्राप्त व्हावी, अशी इच्छाही काही सदस्यांनी व्यक्त केली.
Users Today : 96