मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
पूर्वीच्या काळात बैलगाडीची मोठी क्रेझ होती. शेतातील कामासह वाहतुकीसाठी बैलगाडीचा सर्रास वापर व्हायचा. अर्थात त्याकाळी बैलगाडी शिवाय पर्यायच उपलब्ध नसायचा. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात बैलगाडीचे महत्त्व कमी कमी होत गेले. त्यामुळे कधीकाळी वऱ्हाड नेण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारी सजावट केलेली दमिनी काळाच्या ओघात पडद्याआड गेली आहे. किंबहुना या पिढीला ग्रामीण भागातील दमणी माहिती सुद्धा नसेल हे विशेष! ग्रामीण भागात प्रत्येकाचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी असायचा. शेतकरी सघन असो की अल्पभूधारक प्रत्येकाकडे बैल जोडी व बैलगाड असायचे. शेतातील कामासह वाहतुकीचे एकमेव साधन म्हणून ग्रामीण भागात बैलगाडीची खरी ओळख होती. बोटावर मोजण्याइतके कुटुंब व घरे सोडले तर जवळपास सर्वांकडे बैल जोड्या व बैलगाडी असणारच अशी स्थिती होती. त्यामुळे बैलगाडीचा पेटंट ग्रामीण भागात सर्वत्र प्रसिद्ध होता. पेरणीपूर्व शेतीची मशागत करायची म्हणजे बैल जोडीचा उत्तम वापर व्हायचा. नांगरटी, वखरटी असो शेतात सरी पाडणे असो, की विहिरीतील तुम्ही पाणी उपसणे असो अथवा शेतातील शेतमाल घरी नेणे असो, अशी विविध कामे बैलजोडीद्वारे अर्थात बैलगाडीने केली जायची. बैल जोडीच्या जीवावर अनेक कुटुंब व्यवसाय, शेती अवलंबून होती. वैरण व धान्याची वाहतूक व्यवस्था म्हणून बैलगाडीकडे पाहल्या जायचे. लग्नसराईत तर मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला तसेच परिसरातील यात्रेला सुद्धा बैलगाडीतूनच जाणे येणे व्हायचे. लग्नाची मिरवणूक साठी तसेच लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी व आणण्यासाठी सुद्धा बैलगाडीचाच वापर केला जायचा. ज्यांच्याकडे बैल जोड्या व बैलगाड्या तो गावातील मोठा माणूस समजला जायचा. बैलाशिवाय शेती नाही, अशी ती स्थिती होती. तर बदलत्या काळानुसार आता मात्र ज्यांच्याकडे ट्रॅक्टर-ट्रॉली व इतर मोठी वाहने आहेत, तो मोठा व्यक्ती समजल्या जातो. त्याकाळी मात्र सुखदुःखात बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता, ती बैलगाडी आता हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे. महत्त्वाचे म्हणजे कधीतरी याच बैलगाडीचा वन्हाड नेण्यासाठी उपयोग व्हायचा ही बाब सुद्धा आताच्या पिढीला पटणार नाही, एवढे मात्र खरे ! आठवणी इतिहास जमा वऱ्हाड नेण्यासाठी बैलगाड्यांचा उपयोग व्हायचा. तर या बैलगाड्यांच्या पुढे जातांना नवरदेव तर येतांना नवरदेव व नवरीला रंगबेरंगी कापडांनी सजविलेल्या दमणीमध्ये गावात आणले जायचे. ही दमणी आता ग्रामीण भागातून नामशेष झाली आहे. बदलत्या काळात चार चाकी वाहनांचा पर्याय उपलब्ध झाल्याने काळाच्या ओघात त्या आठवणी इतिहास जमा झाल्या आहेत.
Users Today : 160