बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
‘वक्फ संशोधन कायदा २०२५ ‘हा मुस्लिम समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून मस्जिद, ईदगाह, मदरसे, दर्गा आणि कब्रस्तान यांसारख्या धार्मिक स्थळांपासून समाजाला वंचित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करीत या कायद्याच्या निषेधार्थ २८ मार्च रोजी काळ्या फिती लावून विरोध दर्शविण्यात आला. हे विधेयक आणून केंद्र सरकार मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर लक्ष ठेवत आहे. तसेच, वक्फच्या जमिनींवर ज्यांनी अवैध कब्जा केला आहे, त्याच लोकांना त्या जमिनी परत देण्याचा हा प्रयत्न असल्याची टिकाही याप्रसंगी करण्यात आली. या अन्यायकारक कायद्याविरोधात मुस्लिम समाजाने तीव्र विरोध व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी (जुमातुलविदा) मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आवाहनानुसार काळ्या फिती बांधून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आवाहनाला प्रतिसाद देत, २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता शुक्रवारच्या मुख्य नमाजवेळी बुलढाणा येथील जामा मस्जिद, दारुस्सलाम मस्जिद तसेच देऊळघाट येथील नवाबिया मस्जिदसमोर मुस्लिम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला.
Users Today : 180