मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
पान्हेरा शेत शिवारातील पाणंद रस्ते, गावजोड रस्ते व शेतरस्ते तातडीने करण्यात यावे, या मागणीकरीता पान्हेरा येथील शेतकऱ्यांनी २६ मार्चपासून पान्हेरा-वडोदा रस्त्यावर आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला संबंधित अधिकारी, राजकीय पदाधिकारी व आदींनी भेट देवून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच काम सुरू करू, असे ठोस आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.पान्हेरा शेत शिवारातील पाणंद रस्ते, गावजोड रस्ते, पुर्णत्वास गेलेले नाहीत. सन २०२३-२४ च्या अतिवृष्टीमुळे गावातील प्रमुख नाल्यातील पाणी हे शेत रस्त्यांमध्ये वाट काढून घुसल्या कारणाने शेत रस्ता अद्यापही हा वाहतुकीस व शेतमाल आणण्यासाठी परिपुर्ण नाही. या रस्त्यांची कामे न झाल्याने पान्हेरा परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याने सदर रस्ते त्वरित करण्यात यावे, या मागणीसाठी माजी सरपंच संजय सखाराम देवकर, शंकर रामभाऊ निंबाळकर, भिकाजी नामदेव खिरोडकर, संदीप पांडूरंग ताठे, अनंता तायडे, वसंतराव उत्तमराव तायडे यांचेसह आदींनी उपोषण सुरू केले होते. या उपोषण मंडपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी उगले, ठाणेदार गणेश गिरी, तलाठी, गावचे सरपंच राजीव तायडे, रामेश्वर तायडे, गजानन पाटील, महेश मराठे आदींनी भेट देवून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नाला सरळीकरणाचे काम व पान्हेरा हरसोडा रस्त्याचे कामाला सुरूवात करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
Users Today : 196