धाड:-विशेष प्रतिनिधी
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, तरुणांमधील वाढते नैराश्य, व्यसनाधीनता कमी व्हावी, यासाठी धाडनगरीत बलिदान मास पाळण्यात आला. २९ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी संपूर्ण धाडनगरीतून मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो शिवप्रेमी शंभूभक्तांची उपस्थिती होती.धर्मवीर संभाजी महाराजांना क्ररकर्मा औरंगजेबाने फंदफितुरीने पकडून अनेक नरकयातना, यमयातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यत कुऱ्हाडीने तुकडे-तुकडे करून, अत्यंत हालहाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्राही निघाली नाही. इतके दाहक आणि दिव्य बलिदान त्यांनी अखंड हिंदू समाजासाठी दिले. अशा मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याचे स्मरण व्हावे, तरुणांमधील वाढते नैराश्य, व्यसनाधीनता कमी व्हावी, यासाठी शंभूभक्तांकडून २८ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान दिवस धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. या काळात दररोज सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, श्लोक, प्रेरणामंत्र घेण्यात आले. शेकडो तरुणांनी या कालावधीत आपली आवडती वस्तू, पदार्थ वर्ज्य केले होते.दरम्यान, २९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या शामियानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ही मूक पदयात्रा बोराडेनगर, राममंदिर, बुलढणा अर्बन बँक, छत्रपती संभाजी महाराज चौक, देशमुख टॉवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना आठवडी बाजार, बालाजी मंदिर, खेडकर गल्ली, कुंभार गल्ली, हनुमान मंदिर, धर्मजागृती चौक, सराफा गल्ली व पुन्हा आठवडी बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात येवून ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र घेण्यात आले.त्यानंतर उपस्थित हजारावर शिवप्रेमी शंभूभक्तांनी महाराजांना श्रध्दांजली वाहीली. ठाणेदार आशिष चेचेरे यांच्या मार्गदर्शना पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त पार पाडला.
Users Today : 206