माई रमाई यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार निर्णय घेणार का? – नारायण बागडे यांचा सवाल
मुंबई – कोट्यवधी समाजाची प्रेरणास्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ देणाऱ्या माई रमाई यांचे राष्ट्रीय स्मारक वरळी स्मशानभूमीत उभारण्यात येणार की नाही, असा थेट सवाल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सरकारला केला आहे.
बागडे यांनी सांगितले की, “माई रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २७ मे रोजी शासनाने स्मारक उभारणीबाबत ठोस घोषणा करावी. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी मोठा निधी जाहीर करत सरकारने स्वागतार्ह पाऊल उचलले, परंतु रमाईंच्या बाबतीत अजूनही निर्णयाचा पत्ता नाही.”
गेल्या अनेक वर्षांपासून आंरिमो व इतर आंबेडकरी संघटना वरळी स्मशानभूमीत रमाईंच्या स्मारकासाठी प्रयत्नशील आहेत. “सत्ताधारी पक्षात आमचे काही नेते असूनही त्यांनी या विषयावर एक शब्दही उच्चारलेला नाही, ही दुर्दैवी बाब आहे,” असेही बागडे म्हणाले.
“वरळी स्मशानभूमीस ‘माई रमाई स्मशानभूमी’ नाव मिळाले, परंतु स्मारकाचा आराखडा अद्याप तयार नाही. ही उदासीनता आंबेडकरी समाजाला अपमानित करणारी आहे,” असा आरोप करत त्यांनी सांगितले की, २७ मे रोजी वरळी स्मशानभूमीवर अभिवादन कार्यक्रमातून स्मारक उभारणीसाठी देशव्यापी अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.
Users Today : 49