झरी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती तोट्यात जात असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी तसेच शेतमालाला हमीभाव कायदा लागू करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर येथे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित, झरी युवक काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राहुल दांडेकर आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष नीलेश एलटीवार यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागण्यांचे साकडे घातले.
निवेदनात मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करावी.
शेतमालाला हमीभाव कायदा लागू करून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करावे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले १८,५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान तत्काळ वितरित करण्यात यावे.
प्रत्येक शेतकऱ्याला ५०,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.
रब्बी हंगामासाठी २०,००० रुपयांची विशेष आर्थिक मदत जाहीर करावी.
सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवावी आणि किमान दर हमीभावानुसार द्यावा.
निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाने केलेली ८,५०० रुपयांची तुटपुंजी मदत अपुरी असून, शेतकऱ्यांना सावरू शकणारी नाही. त्यामुळे तात्काळ वाढीव अनुदान देऊन शेतकऱ्यांचा दिलासा करावा, अशी ठाम मागणी युवक काँग्रेसने केली.
या प्रसंगी अशोक पंधरे, हरिदास गुरुजलवार, बळीराम पेंदोर, मिथून सोयाम, निखिल चौधरी, करमचंद बघिले, अशोक शरलावार, श्रीकांत अनमुलवार, संजय कुरमचेटीवार, राजू उपरे, संतोष जंगीलवार यांच्यासह झरी तालुक्यातील शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 36