गुवाहाटी (क्रीडा प्रतिनिधी):
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने संघात तीन बदल करत नव्या संयोजनासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा अपेक्षित फायदा होण्याऐवजी टीम इंडियाला मोठा तोटा सहन करावा लागला. वॉशिंग्टन सुंदरच्या एका चुकीमुळे भारताला तब्बल 54 धावांचा फटका बसल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसन, हार्षित राणा आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली. मात्र, सुंदरचा क्षेत्ररक्षणातील एक चुकलेला झेल टीमसाठी महागात पडला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 186 धावा केल्या, आणि भारतासमोर 187 धावांचं आव्हान उभं केलं. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने टिम डेविडचा झेल सोडला, आणि त्याच क्षणापासून सामन्याचा प्रवाहच बदलला.
सहाव्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीस आला असताना, चौथ्या चेंडूवर टिम डेविडने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. सोपा झेल हातात असूनही वॉशिंग्टन सुंदरने तो पकडण्यात अपयश आले. त्यावेळी टिम डेविड केवळ 20 धावांवर होता.
पण त्यानंतर त्याने 5 षटकार आणि 8 चौकारांसह केवळ 42 चेंडूत 74 धावा ठोकल्या. त्यातच त्याने तब्बल 129 मीटर लांब षटकार मारून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात लांब षटकाराचा विक्रम केला.
विशेष म्हणजे, वॉशिंग्टन सुंदर स्वतः एक अष्टपैलू खेळाडू असून, त्याने आजच्या सामन्यात एकही षटक टाकलं नाही. त्याचा टी20 आंतरराष्ट्रीय इकोनॉमी रेट 6.94 असून त्याने आतापर्यंत 48 बळी घेतले आहेत, तरीदेखील त्याला गोलंदाजीची संधी न देणं सर्वांना आश्चर्यचकित करणारं ठरलं.
त्याऐवजी एक षटक अभिषेक शर्माला दिलं गेलं, ज्याने 13 धावा दिल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या या रणनीतीबद्दल क्रीडाविश्लेषक आणि चाहत्यांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे.
भारताकडून आता हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र, वॉशिंग्टन सुंदरचा झेल आणि त्यानंतर टिम डेविडची तुफानी खेळी ही या सामन्यातील निर्णायक वळण ठरल्याचं मानलं जात आहे.
Users Today : 18