नवी दिल्ली –
भारत सरकारने संरक्षण सज्जतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलत तब्बल ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र व अत्याधुनिक यंत्रणांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल अधिक सक्षम होणार असून शेजारील पाकिस्तान आणि चीनसाठी ही बाब चिंतेची ठरण्याची शक्यता आहे.
दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषद (DAC) ची बैठक पार पडली. या बैठकीत विविध संरक्षण प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात आली.
भूदलाला मिळणार अत्याधुनिक क्षमता
या निर्णयानुसार भारतीय भूदलाला लोइटर म्यूनिशन सिस्टिम उपलब्ध होणार असून, त्याद्वारे शत्रूच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ला करता येणार आहे. तसेच लो-लेव्हल लाइटवेट रडार मिळणार असल्याने कमी उंचीवरून येणारे ड्रोन व यूएव्ही शोधणे आणि त्यांचा मागोवा घेणे अधिक सोपे होणार आहे.
नौसेनेला बळकटी
भारतीय नौसेनेसाठी बोलार्ड पुल टग्स खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे युद्धनौका व पाणबुड्यांची बंदरातील हालचाल अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. याशिवाय हाय फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर-डिफाइंड रेडिओ (HF SDR) मुळे नौदलाची दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल.
वायुदलाची सुरक्षितता वाढणार
वायुदलासाठी ऑटोमॅटिक टेक-ऑफ व लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टिम खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. कोणत्याही हवामानात विमानांचे सुरक्षित टेक-ऑफ व लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.
सामरिक समीकरणांवर परिणाम
भारताच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशाची संरक्षण क्षमता अधिक भक्कम होणार असून, भविष्यातील संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाकिस्तान आणि चीनसमोरील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—
Users Today : 11