अमरावती
घातखेडा येथील तलावात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांवर सोमवारी अमरावतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सहलीसाठी गेलेल्या या चार मुलांचा करुण अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
मानव उर्फ आदित्य नरेंद्र जोशी (१३), सोनाली नरेंद्र जोशी (१६), पायल बबलू पंडित (२१) आणि यश गजानन काकणे (१३) अशी मृत मुलांची नावे आहेत. रविवारी दुपारी घातखेडा येथील तलावात ही दुर्घटना घडली होती.
सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर चारही मुलांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर खोलापुरी गेट परिसरातून एकाचवेळी चारही पार्थिवांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी परिसरातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
पोटच्या मुलांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्थानिक स्मशानभूमीत चारही पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुःखद प्रसंगी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून चारही निष्पाप जीवांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहरभरातून हळहळ व्यक्त केली जात असून या दुर्घटनेमुळे अमरावती शोकमग्न झाली आहे.
Users Today : 14