दिपक मापारी, रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ५ जानेवारी रोजी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर व दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात येण्यासाठी व पिकविम्याच्या मोबदल्याचा जागर करण्यासाठी विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या एआयसी विमा कंपनीने अद्यापही नुकसान भरपाई मंजूर केली नाही. त्यामुळे पात्र असलेले शेतकरी भरपाई पासून वंचित आहेत. याआधी रिसोड येथे मोर्चा काढून ३१ जानेवारीची मुदत दिली होती. मात्र मुजोर झालेल्या कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला दिला नाही. त्यामुळे आता आक्रमक होत ह्या मोर्चाचे आयोजन केले असल्याचे इंगोले यांनी सांगितले आहे. पिकविम्या सोबतच अतिवृष्टीची सरकारी मदत, सोयाबीनच्या भावात वाढ व इतर मागण्या घेऊन हजारो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकणार आहेत.
Users Today : 25