कामासाठी बाहेर पडले; दुचाकीवरून जात असताना अनर्थ, अन् माजी सरपंचाच्या जाण्याने गावावर शोककळा

Khozmaster
3 Min Read

सातारा – लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती महामार्गावर खाली पडली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या तिसर्‍याच दुचाकीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, की अभय रामचंद्र मेनकुदळे (वय ५३, रा. शिखरशिंगणापूर, ता. माण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते माजी सरपंच आहेत. सोपान शामराव राऊत हे जखमी झाले आहेत. सेवानिवृत्त पोलीस हवालदार सोपान शामराव राऊत व अभय रामचंद्र मेनकुदळे हे दोघे दुचाकीवरून शिखरशिंगणापूरहून सातार्‍याकडे काही कामानिमित्त निघाले होते. दुपारी वाजण्याच्या सुमारास ते गोळेवाडी फाट्याजवळ आले होते. त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता, त्याचदरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेने दोघे जण खाली पडले. यावेळी धडक देणारी दुचाकी निघून गेली. मात्र, पाठीमागून आलेल्या तिसर्‍या दुचाकीचे पुढचे चाक डोक्यावरून गेल्याने अभय मेनकुदळे हे जागीच ठार झाले. तर सोपान राऊत हे जखमी झाले. अपघातानंतर प्रत्यक्ष घटनास्थळावरील वाहनधारकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून घेतली. उपनिरीक्षक गणेश माने हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अभय मेनकुदळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी शिखर शिंगणापूर येथे नेण्यात आला.

या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे. दोन्ही दुचाकीचालक श्रीकृष्ण बंडू सोनटक्के, (रा. भूम, जि. धाराशीव) आणि अभिषेक वसंत भडकवाड, (रा. सुर्डी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. उपनिरीक्षक गणेश माने या प्रकरणी तपास करत आहेत. मृत अभय मेनकुदळे यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहीत मुलगी, नातवंडे, आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने शिखर शिंगणापूरसह कोरेगाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

अभय मेनकुदळे हे माण तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत होते. माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. काही काळ त्यांनी प्रभाकर घार्गे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी पाच वर्षे सरपंचपद भूषविले. कोरेगाव येथील प्रसिध्द किराणा व्यापारी स्वर्गीय अशोक आत्माराम उंबरदंड यांचे ते जावई आणि राजेंद्र तसेच संजय उंबरदंड यांचे मेहुणे होते. त्यांचे शालेय शिक्षण कोरेगावातच झाले असून उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांची विशेष ओळख होती.

0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *