म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी आंदोलनामुळे तणावाचे वातावरण पसरल्यामुळे रात्रीपासून पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी दिवसभरातील या भागातील बस रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.राज्यात मराठा आंदोलन शांततेत सुरू असताना बीड जिल्ह्यात एसटीच्या काही बसवर दगडफेक झाली होती. त्यानंतर पुण्यासह अन्य जिल्ह्यांतून बीड, लातूरकडे जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानकातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस रात्री अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काही प्रवाशांना पुन्हा घरी जावे लागले. रविवारीही शिवाजीनगर स्थानकावर बीड, लातूरसह मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती. मात्र, आंदोलनामुळे बस रद्द झाल्याचे समजल्यावर प्रवाशांना घरी परतावे लागले. त्यात त्यांना त्रास सहन करावा लागला.
याबाबत शिवाजीनगर आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणावरे यांनी सांगितले, की पोलिसांच्या सूचनेनुसार बीड आणि लातूरला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात बीडसाठी सात आणि लातूरच्या आठ बसचा समावेश आहे. रविवारी दिवसभर या मार्गावर बस सोडण्यात आल्या नाहीत. पोलिसांच्या पुढील सूचना येईपर्यंत गाड्या सोडण्यात येणार नाहीत.
Users Today : 15