पाणीसमस्या ‘जैसे थे’! पाणीवाटपाचे वेळापत्रक बदलूनही नवी मुंबईकर तहानलेलेच

Khozmaster
3 Min Read

 नवी मुंबई : स्वतःचे मालकीचे मोरबे धरण असूनही नवी मुंबई महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. गावठाण भागात कमी दाबाने पाणी येत आहे. पाण्याची समस्या दूर काढण्यासाठी पाणीवाटपाचे नियोजनही बदलण्यात आले आहे. मात्र असे असूनही पाणीसमस्या सुटलेली नाही. अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असून याबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. नेरूळमधील सारसोळे आणि महापे गावांत पाण्याची टंचाई अजूनही कायम आहेनेरूळमधील सारसोळे, कुकशेत गावात गेल्या वर्षभरापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी सक्तीचे जागरण करावे लागते. या पाणीसमस्येवर तोडगा काढावा, य़ासाठी स्थानिक नागरिकांनी पालिकेवर मोर्चे काढले, ठिय्या आंदोलन केले. मात्र आंदोलन झाल्यावर काही काळासाठी पाण्याची समस्या सुटते आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मागच्याच महिन्यात पाण्यासाठी येथील नागरिकांनी पालिकेवर घागर मोर्चाही काढला होता. मात्र पाण्याची समस्या अजूनही दूर झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा माजी प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिकेकडे निवेदन देऊन नेरूळ सेक्टर ६, सारसोळे गाव येथील पाणीसमस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे धरण आहे आणि ते यावर्षी पाण्याने काठोकाठ भरलेही आहे. असे असतानाही नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे. त्यानुसार, पाणीवाटपाचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार पाणीवाटपाचे नवीन वेळापत्रक पालिकेच्या वतीने तयार करण्यात आले असून त्यानुसार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र असे असतानाही अनेक भागांत पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे आतापेक्षा पूर्वी होते तेच वेळापत्रक बरे होते, असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.अशीच परिस्थिती महापे गावातही आहे. या भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असतो. मात्र एका आठवडा पाणीपुरवठा सुरळीत असतो तर, पुढच्या आठवड्यात पाण्याची टंचाई असते. एमआयडीसीकडून महापालिका घेत असलेले पाणी कमी असून पाण्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. म्हणून या परिसरात मोरबे धरणाच्या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गावामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने सर्व रहिवासी, नागरिक त्रस्त झालो आहोत. याआधी मोर्चा काढल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते, मात्र आता पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. येत्या सात दिवसांत पाणीसमस्या न सुटल्यास आम्ही पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करून उपोषणाला सुरुवात करू.- मनोज मेहेर, माजी प्रभाग समिती सदस्य, सारसोळे गाव

महापे गावात पाण्याची समस्या पाचवीला पुजली आहे. पालिकेकडे वारंवार विचारणा केली की काही दिवस पाणी सुरळीत येते, मात्र त्यानंतर पुन्हा पाण्याची टंचाई सुरू होते. कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सर्वांचे कामाचे वेळापत्रक बिघडते. आमच्या गावाला नियमितपणे आणि पुरेसे पाणी कधी मिळेल, याची आम्हाला प्रतीक्षा आहे.- संदीप कोंढाळकर, नागरिक, महापे

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *