किराणा दुकानांतही मिळते ‘पेनकिलर’; किडनीग्रस्त आसोलातील विदारक वास्तव, गावात ३२ रुग्णांच्या मृत्यूचा दावा

Khozmaster
2 Min Read

 यवतमाळ : नेर तालुक्यातील आसोला गावात वर्षाला किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचासाठी यवतमाळ, सावंगीच्या रुग्णालयात जावे लागते. अनेकदा उपचारासाठी लांब रांग असते. नंबरच लागत नाही. खासगीतील महागडे उपचार परवडत नाही. दुष्काळी परिस्थितीत पोटाची भूक शमविण्यासाठी पैसा नसताना उपचार कुठून करायचा म्हणून गावकरी वेदनाशमक औषधे घेतात. घरोघरीच रुग्ण असल्याने या गावातील किराणा दुकानातही ही वेदनाशमक औषधी मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या गावात पाच वर्षांत ३२ जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.

यवतमाळ-नेर मार्गावर आसोला हे गाव आहे. या गावातील गणेश चव्हाण यांचा किडनीच्या आजाराने जून महिन्यात मृत्यू झाला. यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांची पत्नी सुनिता यांचा मृत्यू झाला. गावात आजही अनेक किडनीचे रुग्ण आहेत. महागडे उपचार परवडत नसल्याने हा त्रास सहन करीत जगत आहेत. यापूर्वी २०१८मध्ये किडनीच्या वाढत्या रुग्णांमुळे हे गाव चर्चेत आले होते. चार वर्षांत १४ किडनीग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभाग सांगते. तर गावकरी या संख्येत आता १६ रुग्णांची भर पडल्याचे सांगतात. हे सर्व शेतकरी आणि शेतमजूर होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी आसोलाचा प्रश्न लावून धरला. यानंतर गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आसोला गावात किडनी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समजताच राज्याच्या नेफ्रोलॉजिस्ट सोसायटीचे नागपुरातील डॉ. धनंजय उखळकर व अमरावतीचे डॉ. अविनाश चौधरी यांनी गावात येऊन या समस्येचा अभ्यास केला होता. त्यांच्यामुळे आसोला गावातील किडनीग्रस्तांची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली. यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या. गावात बोअरवेल आणि विहीर असल्याने त्याच्या पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. पाण्यात ‘नायट्रेट’चे प्रमाण अधिक आढळले. यानंतर गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला. यानंतर किडनीग्रस्तांचा प्रश्न मागे पडला. आरोग्य विभागाचेही गावाकडे दुर्लक्ष झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

पाच वर्षांपासून गावात किडनी आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अजूनही सुमारे चाळीसहून अधिक नागरिक या आजाराने ग्रस्त असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. यातील अनेकांना डायलेसीसची गरज आहे. त्यांना यवतमाळ, सावंगीच्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातही डायलेसीससाठी सध्या दहा मशिनरी उपलब्ध आहेत. जिल्हाभरातील किडनीचे रुग्ण या रुग्णालयात येतात. अनेकदा नंबर लागत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
0 9 5 0 6 0
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *