यवतमाळ : नेर तालुक्यातील आसोला गावात वर्षाला किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचासाठी यवतमाळ, सावंगीच्या रुग्णालयात जावे लागते. अनेकदा उपचारासाठी लांब रांग असते. नंबरच लागत नाही. खासगीतील महागडे उपचार परवडत नाही. दुष्काळी परिस्थितीत पोटाची भूक शमविण्यासाठी पैसा नसताना उपचार कुठून करायचा म्हणून गावकरी वेदनाशमक औषधे घेतात. घरोघरीच रुग्ण असल्याने या गावातील किराणा दुकानातही ही वेदनाशमक औषधी मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या गावात पाच वर्षांत ३२ जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.
आसोला गावात किडनी रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समजताच राज्याच्या नेफ्रोलॉजिस्ट सोसायटीचे नागपुरातील डॉ. धनंजय उखळकर व अमरावतीचे डॉ. अविनाश चौधरी यांनी गावात येऊन या समस्येचा अभ्यास केला होता. त्यांच्यामुळे आसोला गावातील किडनीग्रस्तांची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली. यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या. गावात बोअरवेल आणि विहीर असल्याने त्याच्या पाण्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. पाण्यात ‘नायट्रेट’चे प्रमाण अधिक आढळले. यानंतर गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला. यानंतर किडनीग्रस्तांचा प्रश्न मागे पडला. आरोग्य विभागाचेही गावाकडे दुर्लक्ष झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
Users Today : 8