नाशिक : ‘उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून निर्माण करावा लागतो’ हा सुविचार खैरेवाडीतील शाळेच्या भिंतीवरून वाकुल्या दाखवितो. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली, पण त्यांच्या सर्व पिढ्या अंधारातच खपल्या. उद्याही आयुष्य प्रकाशमान होईल याचीही कुणाला शाश्वती नाही. या वाडीने कधी आमदार पाहिला नाही. जिल्हाधिकारी तर आयुष्यात पहिल्यांदा पाहिले. मोठे साहेब स्वत: आल्यानं गावकऱ्यांच्या डोळ्यांत चमक आली. ‘आता चांगले दिस येतील, इथं रस्ता बनंल, आमच्या जीवाला दरडीचा असलेला धोका टळंल अन् समदं बराबर होईल’, अशी भाबडी आशा निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर अधिकाऱ्यांनी माना डोलवायला तीन महिने पूर्ण झाले. पण आमचं जगणं कणभरही बदललं नाही. आमचं उद्याचं जगणं चांगलं राहील की नाही माहित नाही, पण औंदा लवकर टिपवन येईल’ असे येथील रहिवाशांचे भाकीत आताच तंतोतंत खरं ठरू लागलंय.
खैरेवाडीच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच दिल्याने ग्रामस्थ आशादायी आहेत. परंतु, तूर्तास कागदी घोडे नाचविण्यापलीकडे प्रत्यक्षात फार काही कामे दृश्य रूपात उभी राहू शकलेली नाहीत. कामांची पाहणी करायला मी पुन्हा येईन, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी कामे केव्हा सुरू होतील आणि जिल्हाधिकारी पुन्हा केव्हा खैरेवाडीत येतील, या नवीन प्रश्नाची ग्रामस्थांच्या आयुष्यात भरच पडली आहे.
रस्ताच नाय म्हून कोण येत बी नाय!
इगतपुरी तालुक्यातील दुर्गम खैरवाडीकरांचे दुखणे
दुर्गम भागात वसलेल्या खैरेवाडीचे मूळ दुखणे ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही, हे आहे. खैरेवाडीला मूळ प्रवाहात आणायचे असेल, जगाशी जोडायचे असेल तर चिंचलखैरेपासून खैरेवाडीपर्यंत जाणारा रस्ता प्राधान्याने बनविणे गरजेचे आहे. हा रस्ताच येथील रहिवाशांसाठी राजमार्ग ठरणार आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा आडवळणी वाटेवरून चालत खैरेवाडीला पोहोचले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचे फोटोही आपण पाहिले. नाशिक शहरापासून ५०-६० किलोमीटरवरील एखादं गाव इतकं दुर्गम आणि विकासापासून कोसो दूर असेल, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मटाच्या प्रतिनिधीला खैरेवाडीपर्यंत पोहोचताना तोच अनुभव आला. ही पायपीट करताना एखादा आयएएस अधिकारी तळमळीने तेथपर्यंत जाऊन आला, ही बाब निश्चितच सुखावणारी.कुठे आहे खैरेवाडी?
नाशिक, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या बॉर्डरला लागून जिल्ह्यातील चिंचलखैरे हे शेवटचे गाव आहे. गावात सर्वाधिक लोक ठाकर समाजाचे, तर त्याखालोखाल कातकरी. गावातील २७० उंबरे पाच वाड्यांमध्ये विभागले आहेत. तेथील एकूण लोकसंख्या दीड हजारांच्या जवळपास. कसारा घाट सुरू होण्यापूर्वी घाटनदेवीचे मंदिर लागते. घाट उताराच्या रस्त्याने पाच-सहा किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताला लागणारा रस्ता चिंचलखैऱ्यात घेऊन जातो. स्वत:च साधन असेल तरच ये जा करणे शक्य. या गावाला आदूरपाडा, उंबरपाडा, मुरमटवाडे, खैरेवाडी अशा चार वाड्या असून चिंचलखैरे हे मुख्य गावठाण आहे. जंगल भागातून एकट्या व्यक्तीने खैरेवाडीपर्यंत जाण्याचा निर्णय धाडसी ठरू शकतो. खैरेवाडीत वीज पोहोचली असल्याने तारांच्या खांबांचा आधार घेतच तेथपर्यंत पोहोचता येते. रस्ताच नसल्याने विजेच्या खांबांचा आधार सुरक्षित ठरतो. या जंगल परिसरात बिबट्यांचे ठसे सहज दिसतात, असे ग्रामस्थ सांगतात.
माळाच्या टेकडीतून ‘इर्शाळवाडी’ची भीती
माळाच्या टेकडीच्या पायथ्याशी खैरेवाडीत अनेक कुटुंबे राहतात. चार वर्षांपासून पावसाळ्यात टेकडीचा काही भाग कोसळत असतो. त्यामुळे या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन पावसाळा काढावा लागतो. ईर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे या वाडीकडे लक्ष वेधण्यात आले. येथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा, असे फर्मान इगतपुरी तालुका प्रशासनाने सोडले आहे.
या वाडीसाठी शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. पाचवीपर्यंतच्या १३ विद्यार्थ्यांना शाम आमदाने व संतोष केवारे हे दोन शिक्षक शिकवितात. बाजूलाच अंगणवाडीत ६ वर्षांपर्यंतची १२ मुले असून, त्यापैकी दोघे कुपोषित आहेत. त्यांना यशोदा भगत ही अंगणवाडी शिक्षिका शिकविते. या सर्वांना पोषण आहार पुरविला जातो. स्वराज फाउंडेशनने शाळेच्या छतावर सोलर पॅनलसारख्या सुविधा पुरविल्या आहेत. अन्य सामाजिक संस्थाही येथील मुलांना शिक्षणासाठी आवश्यक साधने पुरवितात. पाचवीच्या पुढील शिक्षणासाठी मात्र चिंचलखैरे गाठावे लागते.
घर मोडणं सोपं हाय का?
खैरेवाडीतील बाळू शिद, वाळू शिद, बच्चू उघडे ही तरुण पोरं पोटतिडकीनं बोलतात. घरे सोडा, दुसरीकडे जा अशा नोटिसा तहसीलदार बजावतात. ‘पिढ्यानपिढ्या आम्ही येथेच राहातो. ही घरं मोडायची अन दुसरीकडं संसार थाटायचा हे बोलण्याइतकं सोपं काम असतंय का? नोटिसा बजावतात, पण सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणं ही सरकारची जबाबदारी नाय का, असा सवाल ते करतात. पाऊस आला की नोटिसा देऊन जातात. नंतर पुढील पावसाळ्यातच येतात. आता वातावरण ठीकठाक असतानाच आमचे मुलभूत प्रश्न का सोडविले जात नाहीत. ईर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन आणि सरकार पाहतंय का, असा सवाल ही तरुण मंडळी उपस्थित करतात.
शे दीडशेसाठी पायपीट
खैरवाडीकडे जाताना तीन-चार तरुण डोक्यावर भाजीपाल्याची पाटी घेऊन इगतपुरीला निघाले होते. ‘टोपलीत काय आहे?’ असं विचारल्यावर डांगर, पालेभाजी आणि कारली असल्याचं त्यांनी सांगितलं. यातून शे- दीडशे रुपये हाती पडतात. पण त्यासाठी त्यांना दहा किलोमीटरची पायपीट, लागवडीचे कष्ट, येण्याजाण्याचा खर्च सोसावा लागतो. रोजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी अथवा मुंबई महामार्गावरील हॉटेलांमध्ये येथील रोजंदारीवर जातात. तर किमान काही किलोमीटर पायपीट करून मध्य वैतरणा येथून पिण्यासाठी अन वापरण्यासाठी पाणी आणणं एवढं एकच काम येथील रहिवाशांना उन्हाळ्यात पुरतं. विहिरी आटल्या असल्यानं पायपिटीला पर्याय नसतो.
गाठावं लागतं नांदगाव सदो
आरोग्य सुविधांची येथे वाणवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले तर बरं होईल असं ग्रामस्थ सांगतात. चिंचलखैरे हे गाव नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडले आहे. साधनांशिवाय तेथे पोहोचता पोहोचताच रुग्ण व नातलगांची दमछाक होते. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचाही पर्याय आहे. पण तुम्ही नांदगाव सदोलाच उपचार का घेत नाही, असा सवाल त्यांना विचारला जातो. पावसाळ्यात तर ओढे, नाले ओलांडणे मुश्किल होते. पाणी ओसरल्याशिवाय बाहेरच पडता येत नाही. अशावेळी रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.
Users Today : 79