हिंगोली : “बांगर साहेब, मला ताप आलाय, मी दवाखान्यात आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय…” असं म्हणणाऱ्या यश हर्षवर्धन कांबळे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्याशी भेट होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने आपल्या पाशात ओढल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.यश हा हिंगोली तालुक्यातील डिग्रस वाणी या गावातील रहिवासी होता. तीन चार दिवसांपूर्वी त्याला ताप आला. ताप वाढतच असल्याने त्याच्या पालकांनी त्याला हिंगोलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तीन दिवस झाले तरी ताप उतरत नव्हता. धीर येण्यासाठी आणि बरं वाटण्यासाठी त्याने कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना भेटण्याची व बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
यशच्या वडिलांनी लागलीच आमदार संतोष बांगर यांना फोनवरून व्हिडिओ कॉल केला. आमदार बांगर यांनी चिमुकल्या यशसोबत आपुलकीने संवाद साधला. त्याला धीर दिला आणि काळजी घेण्यास सांगितलं.यश म्हणाला होता, की आमदार साहेब मला तुम्हाला भेटायचंय. यावर आमदार बांगर यांनी मी बाहेरगावी असल्यामुळे तुला आत्ता भेटू शकत नाही, परंतु उद्या सकाळीच तुला रुग्णालयात येऊन भेटतो. काळजी करू नकोस, असं आश्वासन दिलं आणि काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. परंतु नियतीला या दोघांची भेट होण्याचं कदाचित मान्य नव्हतं.काल रात्री यशला पुढील उपचारासाठी नांदेडला हलवावं लागलं आणि रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. आमदार बांगर सकाळी हिंगोलीत पोहोचल्यानंतर त्याला भेटण्यासाठी निघाले, परंतु चिमुकला यश जगातून निघून गेला. हे हृदयद्रावक वृत्त आमदार बांगर यांना कळल्यानंतर तेही हळहळले. अखेर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते यशच्या गावी गेले आहेत.
Users Today : 73