जालना: ‘आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळ बैठक, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत झालेले निर्णय, सोमवारी बीडमध्ये झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलिस कारवाईबाबत दिलेला इशारा यांसह आरक्षणाबाबत सरकार; विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. ‘हिंसक घटनांच्या मागे सत्ताधाऱ्यांचाच हात आहे. बीडमध्ये निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे थांबवले पाहिजे. चुकीचे गुन्हे दाखल केले, तर मी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसतो. आधी आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी. मी बीडला आलो, तर तुम्हाला कळेल,’ असे ते म्हणाले.राज्य सरकार बीडमधील प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करत आहे. बीड व जालना येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे, यावरही जरांगे यांची टीका केली. ‘या सरकारला दुसरे काय येते. सरकारमधील एक उपमुख्यमंत्री खोडील आहेत. अनेक वर्षांपासून ते समाजा-समाजात भांडण लावत आहेत. हे आता चालणार नाही,’ असे ते म्हणाले. त्यांच्यामुळे राज्यात भाजप मागे जात आहे. त्याला तेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. आमच्या अंगावर कुणी आले तर आम्ही सोडणार नाही. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आत्तापर्यंत घेतलेला एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आरक्षणप्रश्नी कुणीही आमदार, खासदारकीचे राजीनामे देऊ नयेत, त्यांनी मुंबईत बसून सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
Users Today : 73