भुयारी गटारीसाठी नदीत भराव; नमामी गोदा अभियानाला उगमस्थानीच हरताळ, कारवाई कधी?

Khozmaster
2 Min Read

त्र्यंबकेश्वर : गोदावरीच्या उगमस्थानी पवित्र नदीची अवहेलना सुरूच आहे. हरितलवादाने दणका दिल्यानंतर नदीत सांडपाणी नको म्हणून सुमारे ३९ कोटी रुपयांची भूयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवला जात आहे. दोन वर्षांपासून त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नुकतेच तयार करण्यात आलेले रस्ते मधोमध फोडून मालवाहू वाहनांना जाण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे.पावसाळ्यात रिंगरोडला या फोडलेल्या रस्त्यात भरलेले सिमेंट वाहून गेले आणि चारीमध्ये वाहन फसून अपघात घडले. रस्त्याच्या मधोमध टाकेलेले ढापे वाहनांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. सिंहस्थात बांधण्यात आलेले नदीपात्राचे घाट तोडण्यात येत आहेत. त्यात भरीस भर म्हणून गोदावरीच्या नदीपात्रात आता हा भराव टाकण्यात येत आहे. हे तोडफोड करण्यात आलेले काम पुन्हा नव्याने करण्यात येईल, असे नगरपालिका बांधकाम विभाग सांगत आहे. मात्र, मागच्या दोन वर्षात फोडलेल्या रस्त्यांची केलेली मलमपट्टी पाहता घाटांचे काम कोणत्या पद्धतीचे होईल याचा अंदाज नागरिकांना येत आहे. पर्यावरणपेमी नागरिकांच्या मनाला वेदना देणारे प्रकार भूयारी गटारीच्या नावाखाली बिनबोभाट सुरू आहेत. शासनाने ३९ कोटी रुपये खर्च करत केवळ ठेकेदारांचीच सोय पाहिल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

नदीपात्राची अवस्था बिकटनदीत सांडपाणी सोडायचे नाही असा हरित लवादाचा दंडक असतानाही बिनदिक्तपणे त्यात सांडपाणी सोडले जात आहे. शहरातील नदीपात्रासह प्रमुख पात्र देखील सांडपाणी आणि कचऱ्याने व्यापले आहे. सन २००३ मध्ये सिंहस्थ नियोजनात उभारलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प फॅब या कालबाह्य तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यासाठी वेळोवेळी कोट्यवधींची तरतूद करण्यात येते. प्रतिमाह लक्षावधी रुपये खर्च होतात मात्र शहरातील सांडपाणी शुद्ध न होता तसेच नदीपात्रात सोडले जात आहे. दोन वर्षांत आणखी एक-दोन कोटी रुपये खर्चून तात्पुरत्या स्वरुपाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कचरा डेपोच्या समोर उभारण्यात आला आहे. त्यामधून बाहेर पडणाऱ्या काळ्याशार अशुद्ध पाण्याचा प्रवाह नदीपात्रात मिसळतो आहे.कारवाईचा अभाव

त्र्यंबकेश्वर शहरात नीलगंगा, म्हातारओहळ आणि अहिल्या या तीन नदीपात्रात सांडपाणी वाहते. काहींनी शौचालयाचे बाहेर पडणारे पाइप सरळ नदीपात्रात सोडले आहेत. त्याव्यतिरिक्त कचरा फेकण्यात येत आहे. नगर पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना हजार पाचशे दंड करण्यात येतो; मात्र नदीपात्रात सांडपाणी, प्लास्टिक आणि अन्य कचरा टाकणाऱ्यांना सर्वकाही माफ असल्याचे चित्र आहे. नमामी गोदा अभियान केवळ कागदावर आणि बॅनरबाजीपुरतेच मर्यादीत ठेवत नगर परिषद प्रशासन हरित लवादाची फसवणूक करीत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणने आहे.

0 9 5 0 1 3
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *