ठाणे: कळव्यातील विटाव्यात २३ वर्षे जुन्या एकमजली इमारतीच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून महिलेचा मृत्यू झाला, तर पडझडीत एका वृद्धेला दुखापत झाली. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत प्लास्टर हटवले. या इमारतीला जागोजागी तडे गेले असून इमारत धोकादायक अस्वस्थेत आहे. या घटनेमुळे कळव्यातील धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहेविटावा येथील सूर्यानगर भागात असलेल्या भवानी चौकात साईनगर चाळ असून चाळीची एक मजली इमारत आहे. या चाळीतील नवनाथ गोळे यांच्या घरात लीलावती कुंजू या भाड्याने राहतात. त्यांच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. यामध्ये चंद्रिका जनार्दन (३३) यांचा मृत्यू झाला, तर लीलावती (६५) यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बिट निरीक्षक व कळवा प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.याआधीही पाच महिन्यांपूर्वी कळव्यातील खारेगावात दुमजली ३५ ते ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब आणि टेरेसचा काही भाग कोसळला होता. यावेळी या इमारतीतील १२ कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. अशा जीर्ण इमारती वेळीच रिकाम्या न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Users Today : 37