पुणे: मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शुक्रवारी सकाळपासून सर्व मार्गावरील बस सेवा सुरळित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शनिवारी रात्रीपासून पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू होते. तसेच, एसटीचे देखील नुकसान होत होते. गेले दोन दिवस पुण्यातून जाणाऱ्या ७८० फेऱ्या रद्द केल्या जात होत्या. खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू होती. अखेर गुरूवारी रात्री मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर एसटी महामंडळाने पुण्यातून त्यांची सर्व बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून साधारण दिवसाला साडेतेराशे एसटी बसच्या फेऱ्या सुरू असतात. त्या सर्व पूर्ववत केल्या जाणार आहेत. तसेच, रात्री दहानंतर इतर आगाराच्या पुण्यात अडकून पडलेल्या बस रवाना केल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.पुणे एसटी विभागाने गुरूवारी नाशिक, दादर, मुंबई बरोबरच नगर मार्गावर बस सेवा सुरू केली होती. पण, विदर्भ व मराठवाडा, सोलापूर, पंढरपूर परिसरात जाणाऱ्या बस बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे गुरूवारी पुण्यातून जाणाऱ्या पाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे एसटीचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. गुरूवारी शिरूर व इंदापूर हे एसटीचे आगार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
Users Today : 37