दिवाळी येता घरा, विमानप्रवास विसरा; पुणे-मुंबई-दिल्लीच्या तिकीटदरात अव्वाच्या सव्वा वाढ

Khozmaster
2 Min Read

नागपूर : दिवाळीनिमित्त गावी परत येण्याच्या घाईत असलेल्यांनी वाढलेल्या हवाई प्रवासदराचा धसका घेतला आहे. दरवर्षी दिवाळीदरम्यान तिकिटांचे दर वाढतात. मात्र, यंदा दुपटीपेक्षाही अधिक दराने दिवाळीदरम्यान तसेच त्यानंतरही विक्री होत असल्याचे चित्र आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये दिवाळी, नाताळ, थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन यामुळे मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे घरी येणारे वा बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढते. याचा फायदा घेत विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढविले आहेत. दिवाळी यंदा ९ नोव्हेंबर वसुबारसपासून ते १५ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत दर अव्वाच्या सव्वा वाढलेले आढळले. ८ नोव्हेंबरला पुणे-नागपूर विमानाचा दर १९ हजार रुपयांपर्यंत आहे. दिल्ली-नागपूर ५,५०० ते १५ हजार, मुंबई-नागपूर ११ ते १५ हजार, हैदराबाद-नागपूर १४ ते १८ हजार असा दर दाखवित आहे. तर १७ नोव्हेंबरला नागपूरहून परत जाऊ इच्छिणाऱ्यांना नागपूर-पुणे यासाठी १२ ते १३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय, नागपूर-दिल्ली ११ ते १२ हजार, नागपूर-मुंबई १३ हजार, नागपूर-हैदराबाद ९,५०० रुपये दर आहे.याबाबत अधिक सांगताना श्रीकृष्ण टुर्सचे संचालक हरिहर पांडे म्हणाले, ‘सण-उत्सवाचे दिवस वगळता इतर दिवसांमध्ये विमानाच्या तिकिटाचे दर तुलनेने कमी असतात. दिवाळीनंतर १५ दिवसांनी दर कमी होतील. त्यानंतर डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात दर वाढणार आहेत. ही परिस्थिती दरवर्षी असते. परंतु, काही महिन्यांपूर्वी गो फर्स्ट एअरलाइन्सच्या विमानांचे संचालन बंद पडले. परिणामत: इंडिगो एअरलाइन्सने याचा फायदा घेत दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.’गो फर्स्टचे संचालन बंद असल्याने इंडिगोची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्याचा फायदा घेत प्रचंड दर वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे प्रवासी संतप्त आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावेळी झालेली दरवाढ ग्राहकांना परवडणारी नाही. अनेक प्रवासी विमानाचे वाढलेले दर लक्षात घेत टुरचे नियोजन रद्द करत आहेत, अशी माहिती डेस्टिनेशन ट्रॅव्हल्स अॅण्ड व्हेकेशन प्लानर्सचे संचालक राजू अकोलकर यांनी दिली.‘वर्षभर सवलतीच्या दरात आम्ही प्रवाशांना तिकीट देतो. मग, सणांच्या काळात तिकीट महाग केले तर काय झाले’, असा सवाल विमान कंपन्यांद्वारे उपस्थित करण्यात येत आहे. तसेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अर्थात विमानात वापरले जाणारे इंधन महागल्यामुळे दरवाढ झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

0 9 5 0 0 1
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *