पाण्यावरुन धुसफूस; जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची तयारी पूर्ण, नगर जिल्ह्यातून विरोध

Khozmaster
3 Min Read

 छत्रपती संभाजीनगर : उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ८.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला नगर जिल्ह्यातून विरोध सुरू आहे. मात्र, जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची तयारी केली आहे. कायदा अस्तित्वात असताना पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नेत्यांना सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी कायम ठेवली आहे.

समितीची टीका

नगर जिल्ह्यातील मुळा साखर कारखाना, सोनाई साखर कारखाना, केदारेश्वर, गंगामाई, संजीवनी, कुकडी, नगर तालुका साखर कारखाना, संगमनेर तालुका, गंगासागर, कोपरगाव, प्रवरा आणि अशोक कारखाना यांना जायकवाडी लाभधारक क्षेत्रातून ऊस पुरवठा होतो. तरीसुद्धा राजकीय स्वार्थापोटी राजकारणी विरोध करीत आहे, अशी टीका जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने केली आहे.

रब्बी हंगामासाठी पाणीपाळी

रब्बी हंगामासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार पैठण डावा कालव्यातून शुक्रवारी सायंकाळी चार वाजता १०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा विसर्ग स्थिर राहील, असे प्रशासनाने कळविले आहे. रब्बी हंगामात पिकांसाठी पाण्याची पाळी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

‘पाण्यासाठी लढा उभारणार’

जालना : नाथसागर जायकवाडीच्या उर्ध्व भागातील नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून ठरलेल्या नियमानुसार तातडीने मराठवाडयाच्या हक्काच्या पाणी सोडण्यात यावे यासाठी मी लढा उभारणार आहे,’ असे माजी मंत्री, आमदार राजेश टोपे यांनी सांगितले. जालन्यात माध्यमांसोबत ते बोलत होते.जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडल्यानंतर फक्त पाच टीएमसी धरणात पोहचणार आहे. नदीपात्रात जिरलेल्या साडेतीन टीएमसी पाण्याचा नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होईल हा मुद्दाही गैरलागू असल्याकडे जल अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.

‘निवडणुकांमुळे विरोध’

‘जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार १६ टीएमसी पाणी देणे गरजेचे होते. पण, साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा अस्तित्वात असताना पाणी सोडण्यास विरोध करणे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे,’ असा आरोप जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला.

दरम्यान, नाशिक जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची तयारी केली आहे. दोन दिवसांत जायकवाडीकडे पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या पाण्यामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता जायकवाडी धरणात पाणी सोडावे. अन्यथा, जायकवाडी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल.- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष, जायकवाडी पाणी संघर्ष कृती समिती

0 9 4 9 9 4
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *