नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झालाय. गंभीर गोष्ट म्हणजे यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून नांदेडच्या शासकीय रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बेड संख्या कमी आणि रुग्णाची संख्या दुप्पट असताना देखील रुग्णालय प्रशासन झोपेत असल्याचे दिसून येत आहे. ५०० खाटांच्या रुग्णालयात १२०० रुग्ण उपचार घेत आहेत. सद्या रुग्णालयात ७० रुग्ण अत्यंत सिरियस आहेत.विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे मराठवाड्यातील दुसरं मोठं रुग्णालय आहे. नांदेड, परभणी, हिंगोली यासह तेलगंणा राज्यातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. दररोज शेकडोच्या संख्येने रुग्ण भरती होत असते. जवळपास ५०० खाटांचं हे रुग्णालय आहे. मात्र सद्यस्थितीला रुग्णालयात १२०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातही ७० रुग्ण अत्यवस्त असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एका बेडवर दोन रुग्णांना झोपावं लागतंय. जास्त गर्दी असेल तर जमिनीवर झोपूनही रुग्ण उपचार घेतायेत.विशेष म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करुन नांदेडमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे. मात्र ज्या प्रकारे आरोग्य सुविधा पाहिजे, त्याची वाणवा आहे. सोबतच सिटी स्कॅन, मशीन एक्स रे मशीन यासह इतर आवश्यक असलेले तपासणी मशीन बंद असल्याची माहिती आहे. रुग्ण संख्या जास्त असूनही आरोग्य यंत्रणा गाफिल आहे. आजच्या २४ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता नांदेडचे नागरिक विचारतायेत.विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी १२ नवजात बालकं आणि इतर १२ रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकं दगावल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या घटनेची दखल घेत राज्यातील आरोग्य संचालकाची एक समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीसाठी समितीचे सदस्य उद्या मंगळवारी रुग्णालयाला भेट देणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Users Today : 22