संजय राऊतांकडून एल्विश यादववरुन मुख्यमंत्र्यांची कोंडी, विखे पाटील मदतीला धावले, वाझेचा संदर्भ देत म्हणाले..

Khozmaster
2 Min Read

अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली होती. यावरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात माफियागिरी वाढली असून त्यांचे केंद्र मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आहे. इतकेच नाही तर आता हे लोन वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचले आहे,’ असा आरोप राऊत यांनी केला आहे.असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे गटातील नेत्यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहेच, सोबत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आता राऊत यांना उत्तर दिले आहे. त्यासाठी त्यांनी तत्कालीन वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या ‘मातोश्री’वरील उपस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

लोणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याबाबत संजय राऊत यांनी केलेले विधान आश्‍चर्यकारक आहे. या गोष्टीचे एवढे भांडवल करण्‍याची आवश्‍यकता नाही. मात्र, महाविकास आघाडीच्‍या काळात स्‍कॅम मास्‍टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करीत होते? याचाही खुलासा कधीतरी संजय राऊत केला पाहिजे.महाविकास आघाडीच्‍या काळात अनेक स्‍कॅम झाले. या स्‍कॅममधील अनेक जण कधी मातोश्री तर कधी वर्षावर आणि मंत्र्यांच्‍या बंगल्‍यांवर दिसत होते. त्‍यामुळे नागरिकांबरोबर भेटण्‍यासाठी येणा-या प्रत्‍येकाचीच माहिती मुख्‍यमंत्री किंवा मंत्र्यांना नसते. मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यावर गेलेल्‍या व्‍यक्तिबाबत एवढे भांडवल करण्‍याची आवश्‍यकता नाही. याबाबत कोणतेही तथ्‍य नाही, जर काही असेल तर त्‍याची कारवाई होईल, परंतु महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात सचिन वाझे कुठे कुठे फि‍रत होते, खंडणी गोळा करायचे टार्गेट त्‍यांना कोणी दिले होते, याबाबत संजय राऊत गप्‍प का? असा सवालही विखे पाटील यांनी केला.मराठा आरक्षणासंबंधी बोलताना विखे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्‍या बाबतीत सरकारच्‍या शिष्‍टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्‍याशी सकारात्‍मक चर्चा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच सर्वांची भावना आहे. त्‍यांच्‍या मागणीला सर्वांचाच पाठींबा होता. या संदर्भात आता शासन स्‍तरावरुन सर्व कार्यवाही वेगाने सुरु आहे. पण एक गोष्‍ट मात्र नक्‍की आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या हलगर्जीपणामुळेच गेले, असा आरोपही विखे पाटील यांनी केला.

0 9 4 9 7 8
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *