जमेल त्या मार्गाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करा, ओबीसींना एकवटण्याचं छगन भुजबळांचं आवाहन

Khozmaster
3 Min Read

जालना: मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. पण त्यासाठी आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसी समाजाला मुळातच ५४ टक्के लोकसंख्येच्या तुलनेत अर्धेच आरक्षण मिळाले आहे. अशातच आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मागच्या दाराने ओबीसी प्रवर्गात शिरकाव करण्याचा घाट घालण्यात आला आहे. ओबीसी समाजाने त्याला पूर्ण ताकदीने विरोध करावा. अन्यथा एकदा ओबीसी समाजाने आरक्षण गमावले तर ते पुन्हा मिळवता येणार नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. ते सोमवारी जालना आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध दर्शविला.

आरक्षण म्हणजे काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही. राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५४ टक्के आहे. यामध्ये दलित, आदिवासी, भटके, विमुक्त जाती, साळी, तेली, तांबोळी, माळी, धनगर, ओरिजनल कुणबी यांचा समावेश आहे. मात्र, त्यांना अर्धेच म्हणजे २७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी समाज हा गोरगरीब आहे. ओबीसी समाजातील अनेकजण उच्चपदांवर पोहोचले असले तरी झोपडपट्टीत राहणारे दलित, ओबीसी आजही गरीब आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिकदृष्ट्या मागास लोकांसाठी आरक्षण दिले. त्यांना वरती आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले होते, याकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले.तुम्ही मराठा समाजाला, गरीबांना आरक्षण द्या. पण आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण खूप थोडं आहे, त्यामध्ये अजून तुम्ही येऊ नका. खऱ्या कुणब्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, आता राज्यात दररोज नवे कुणबी सापडत आहेत. समोरच्या दरवाज्याने ओबीसी प्रवर्गात येता येत नाही, त्यामुळे मागच्या दरवाजाने ओबीसीत येण्याचा घाट घातला जात आहे. कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्याच्या प्रकाराला तुम्ही विरोध केला पाहिजे. तुमच्यावर होणारा हा हल्ला आणि अन्यायाविरोधात तुम्ही बोलला नाहीत तर सरकारही तुमच्या मदतीला येणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास मोर्चे काढा, आंदोलन करा, साखळी उपोषण करा. हा लढा हिंमतीने लढा. नाहीतर आपलं आरक्षण कायमचं जाईल, ते परत मिळणार नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी उपोषण केलेल्या जालना जिल्ह्यात येऊन भुजबळ यांनी एका प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा आव्हानच दिले आहे. भुजबळ यांनी बीड जिल्ह्यातील जाळपोळ झालेल्या आमदारांच्या निवासस्थानाची तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाची देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढण्याचा निश्चय व्यक्त केला.आ.प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर मला ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी सुभाष राऊत हे माझ्यासोबत मंत्रालयात होते. त्याचवेळी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कल्पना दिली होती की, सुभाष राऊत यांच्या हॉटेल वरती दगडफेक होऊ शकते. त्यानंतर त्यानंतर चार तासानंतर हा प्रकार घडला. चार तास वेळ मिळून देखील या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यात आला नव्हता. यातच पोलिसांचे अपयश दिसते. याबरोबरच पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग ही या प्रकाराची माहिती देऊ शकला नाही, हे अपयश आहे. यात एसआयटी असेल, न्यायालयीन चौकशी असेल, काय करायचे ते करा, यातील गुन्हे देखील मागे घेऊ नका, असे छगन भुजबळ यांनी म्हटले, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सरकारवरच तोफ डागली.

0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *