पवारांच्या काटेवाडीत भाजपची एन्ट्री, पण वर्चस्व अजितदादांचं, नेमकं काय घडलं?

Khozmaster
2 Min Read

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. या ३१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे काटेवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखलं आहे. १६ पैकी १४ जागांवर अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र एक हाती सत्ता असणाऱ्या या ग्रामपंचायतीवर दोन भाजप विचारांचे उमेदवार निवडून आल्याने भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. पहिल्यांदाच काटेवाडीत भाजपचा उमेदवार जिंकून आला, हे अधोरेखित करण्यासारखी बाब असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनल अशी लढत झाली. कित्येक वर्षांपासून पवारांच्या ताब्यात असलेली काटेवाडी ग्रामपंचायत खेचण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली होती. ग्रामपंचायत जरी काबिज करता आली नसली तरी तिथे २ उमेदवार जिंकल्याने इतिहासात पहिल्यांदाच काटेवाडीत कमळ फुलल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. तर काटेवाडी हे गाव पवार कुटुंबीयांच्या नावाने ओळखले जाते. गेली कित्येक वर्ष काटेवाडी ग्रामपंचायतवर पवार कुटुंबीयांचं एकहाती वर्चस्व आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादीमधून बंड केलेले अजित पवार, शिंदे- फडणवीस यांच्या सत्तेत सामिल झाले. तरीही महायुतीत एकत्र असलेले शिंदे -फडणवीस आणि पवार यांच्यामध्येच काटेवाडी ग्रामपंचायत जिंकण्यावरून चुरशीची लढत पाहायला मिळालीयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी राष्ट्रवादी बरोबरच भाजप, शिंदे गट देखील सरपंच पदासाठी नशीब आजमावत अजित पवार गटाला टक्कर देताना दिसून आले. असं असलं तरी अजित पवार गटाचे प्राबल्य जास्त असल्याने शिंदे गट आणि भाजप अजित पवार गटाच्या आव्हानासमोर टिकू शकले नसल्याचे या निकालावरून दिसून येते.

0 9 4 9 7 0
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *