ना पाटील गट ना महाडिक गट कोल्हापूरमधील गावानं इतिहास रचला, गावकऱ्यांनी नवी वाट निवडत घडवलं सत्तांतर

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्यानंतर आज त्याचा निकाल हाती आला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलला सर्वसामान्य जनतेनं नाकारलं आहे. अपेक्षेप्रमाणे याही निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का देत येथे १० विरुद्ध ३ असा निकाल लावत सरपंच पदाच्या अपक्ष उमेदवार श्रद्धा प्रशांत पोतदार या तब्बल ३५ मतांनी विजयी झाल्या आहेत.
महाडिक आणि पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. दोघांमधील राजकीय संघर्ष हा सध्या विकोपाला गेला आहे. मात्र, दोघे कट्टर विरोधक जरी असले तरी आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकत्र पाहायला मिळत आहेत. करवीर तालुक्यातील चिंचवाड या गावात काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या पॅनलची सत्ता होती. यंदा देखील महाडिक पाटील पॅनलची सत्ता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झालेत. मात्र वारंवार तेच चेहरे आणि तीच मंडळी आणि त्यांच मंडळींच्या घरातील उमेदवार यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याने या कारभाराला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी तरुणांचं अपक्ष पॅनल उभं केले.

थेट जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या विरोधातच शड्डू मारण्यात आला आणि आजच्या निकालातून सर्वसामान्य चिंचवाडच्या जनतेने सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला आहे. धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांना नाकारात १०-३ ने अपक्षांनी बाजी मारत सरपंच पदी श्रद्धा प्रशांत पोतदार या तब्बल ३५ मतांनी विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे अनेकांना धक्का लागला असून अपेक्षित निकालाच्या विरूद्ध निकाल लागल्याने आणि प्रस्थापितांना घरी बसवल्याने या निकालाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.दरम्यान, या निकालाबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया देताना महाडिक आणि पाटील पॅनल एकत्र आलं हीच मोठी आणि शुभ गोष्ट आहे असे म्हणाले आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण मधून काय निर्णय येईल हे चिंचवाड निर्णयावरून दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतच चिंचवाडच्या नागरिकांनी एकतर्फी निकाल लावला आहे. यामुळे विधानसभेत तिथे भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे म्हणत चिंचवाडमध्ये आमच्या विचारांचे लोक निवडून आलेले आहेत असा दावा महाडिक यांनी केलाय.
0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *